या संदर्भात मेराज अहेमद अन्सारी यांनी ॲड. एस. एस. काझी यांच्यामार्फत जनहित याचिका दाखल केली होती. याचिकेच्या अनुषंगाने मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी शपथपत्र सादर करून कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक सुविधा पुरविल्या असल्याचे नमूद केले.
महापालिकेतर्फे ॲड. एस. डी. चपळगावकर यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, सध्या कोविड रुग्णांची संख्या बरीच कमी झाली आहे. आता घरीच विलगीकरणात राहण्याची परवानगी शासनाने दिली आहे. मनपा प्रशासक पांडेय यांच्या शपथपत्रानुसार मनपा हद्दीतील सर्व कोविड सेंटरमध्ये आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील.
सुनावणीअंती खंडपीठाने आदेशात असे नमूद केले की, ही जनहित याचिका जुलै महिन्यात दाखल केली होती. आता कोविड रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मनपा प्रशासकाच्या शपथपत्रावर विसंबून खंडपीठाने जनहित याचिका निकाली काढली. तसेच याचिकाकर्त्यांचे अनामत ५० हजार रुपये त्यांना परत करण्याचा आदेश दिला.