नांदेड : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून शुक्रवारी नांदेडचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअस नोंदल्या गेले़ या वर्षातील नांदेड शहराचे सर्वाधिक तापमान आज नोंदल्या गेले़ एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून शहराचे तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस असे नोंदत होते़ मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम आहे़ त्यामुळे उष्णतेने नागरिकांच्या जीवाची काहिली होत आहे़ वाढत्या उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना रात्रीला सुद्धा गरम झळांचा सामना करावा लागत आहे़ यंदा दुष्काळामुळे उन्हाच्या चटक्यांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे़ पाणी व चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील जनता स्थलांतरीत होत आहेत़ दुसरीकडे शहरातही उन्हाच्या प्रकोपाने दैनंदिन व्यापारावर परिणाम झाला आहे़ सकाळी ८ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसत आहेत़ उन्हामुळे दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत नागरिक बाहेर जाणे टाळत आहेत़ त्यामुळे शहरातील अनेक रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत़ लग्नसराई असतानाही बाजारपेठेतील ग्राहकांची वर्दळ मंदावलेली दिसत आहे़ नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी रूमाल, चष्मा वापरत आाहेत़ तसेच लिंबु शरबत, लस्सी, ज्युस, उसाचा रस आदी थंड पेय घेत आहेत़ त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ज्युस सेंटर, रसवंतीगृहावर वर्दळ दिसत आहे़ गेल्या दोन, तीन दिवसांपासून शहराचे तापमान ४२, ४३ अंश सेल्सिअसवर नोंदत होते़ शुक्रवारी यावर्षीचे सर्वाधिक तापमान ४४़० अंश नोंदल्या गेल्याची माहिती हवामान विभागाचे निरिक्षक बालासाहेब कच्छवे यांनी दिली़ साथरोग अधिकारी डॉ़ दुर्गादास रोडे यांनी सांगितले, प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे, जून महिन्यात उष्माघाताचा प्रादूर्भाव होत असतो़ राज्यात विदर्भ व मराठवाड्यात उष्माघाताचा प्रादूर्भाव प्रामुख्याने आढळतो़ उष्माघातापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेत प्रत्येकाने जागरूक राहण्याची गरज आहे़ (प्रतिनिधी)
नांदेड ४४ अंशावर
By admin | Updated: April 16, 2016 01:37 IST