जालना : शहरातील संभाजी उद्यानातील (मोतीबाग) बंद पडलेले कारंजे पुन्हा लवकरच नव्याने सुरू होणार आहेत. उद्यान विकासासाठी मंजूर केलेल्या दीड कोटींच्या निधीतून या कारंज्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता नुकतीच मिळाली आहे. २५-३० वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या मोतीबागेत दहा-बारा वर्षांपूर्वी नवीन साहित्य बसविण्यात आले होते. त्यावेळी संगीत कारंजे, बच्चेकंपनींसाठी मिनीट्रेनही सुरू करण्यात आली. मात्र दोन-तीन वर्षांपूर्वी संगीत कारंजे बंद पडले. मध्यंतरी मोतीबागचा वीजपुरवठा खंडित होता, त्यामुळे मिनी ट्रेनलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेला उद्यान विकास कार्यक्रमाअंतर्गत दीड कोटींचा निधी शासनाने मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातूनच संगीत कारंज्यांचे काम करण्यात येणार आहे. याबाबत आ. कैलास गोरंट्याल म्हणाले, संगीत कारंजाच्या कामांना नुकतीच तांत्रिक मान्यता मिळाली आहे. शासनाने उद्यान विकासासाठी मंजूर केलेल्या कामातूनच हे काम होणार असल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उद्यानातील संगीत कारंजे पुन्हा उडणार
By admin | Updated: June 23, 2014 00:27 IST