जालना : नगरपालिकेने विविध संस्थांना वाटप केलेल्या भूखंडापोटी नगरपालिकेस किती उत्पन्न मिळाले, त्या भूखंडांची सध्याची स्थिती काय अशा विविध बाबींचा शोध घेण्यासाठी उपमुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रभारी नगराध्यक्ष शाह आलमखान यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या बैठकीत ही समिती स्थापन करण्यात आली.नगरपालिकेमार्फत गेल्या पंधरा वर्षांच्या काळात शहरातील अनेक भूखंडांचे वाटप विविध संस्थांना करण्यात आले. काही भूखंडाचे वाटप करताना ते नियमानुसार झाले नाही, अशी शंका निर्माण झाल्याने ही समिती स्थापन करण्यात आल्याचे नगराध्यक्ष शाह आलमखान यांनी सांगितले. उपमुख्याधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत नगररचनाकार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश राहणार आहे. दरम्यान, शहरात गेल्या तीन दिवसात शाह आलमखान यांनी विविध स्वच्छतेच्या कामांना भेटी दिल्या असता दररोज ३८ ते ४० सफाई कामगार गैरहजर आढळून आले. या प्रकाराची आपण गांभिर्याने दखल घेत असून संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही नगराध्यक्षांनी दिला. आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी शहर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठे नाले साफ करून घेण्याच्या सुचनाही नगराध्यक्ष शाह आलम यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. या बैठकीस मुख्याधिकारी दीपक पुजारी, उपमुख्याधिकारी का.क़ मुखेडकर, केशव कानपुडे, बिटले, पोलास, आंधळे, डी.टी. पाटील, सुरेश गंगासागरे, राजू मोरे, श्यामसन कसबे, नेल्सन कांबळे, पी.एस. पवार, विजय फुलंब्रीकर, खालेदखान, सय्यद सऊद, इर्शाद, राजू कुरलिये आदी उपस्थित होते.
पालिका करणार भूखंड वाटपाची चौकशी
By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST