औरंगाबाद : मनपाचे अधिकारी समन्वय ठेवत नसल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचे खा.चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत झालेल्या विशेष बैठकीत समोर आले. मनपा आणि कंपनीतील असमन्वयामुळे जलवाहिनीच्या कामाला उशीर होत असल्याचेही बैठकीत निष्पन्न झाले. पैठण ते नक्षत्रवाडीपर्यंत जलवाहिनीचे काम तातडीने सुरू करण्यासाठी यावेळी कंपनी व मनपा अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. शिवसेनेचा औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला काहीही विरोध नाही. कंपनीने आधी काम करावे, नंतर पाणीपट्टी वसूल करावी, असे माजी आ. प्रदीप जैस्वाल म्हणाले. आयुक्त पी. एम. महाजन म्हणाले, कंपनीने तातडीने जलवाहिनीचे काम सुरू केले पाहिजे. पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर कंपनीने मोफत टँकर दिले पाहिजेत. गळत्या दुरुस्त करून रेंगाळलेली कामे पूर्ण करण्याबाबत कंपनीला सूचना करण्यात आल्या. गळतीचे पाणी रस्त्यांवरून वाहते. त्यामुळे रस्त्यांचेही नुकसान होत असल्याचे कंपनीच्या निदर्शनास आणून दिले.यावेळी महापौर कला ओझा, सभागृह नेते किशोर नागरे, गटनेता गजानन बारवाल, विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, मीर हिदायत अली, शहरप्रमुख राजू वैद्य, बाळासाहेब थोरात, अनिल जैस्वाल, मोहन मेघावाले, गोपाळ कुलकर्णी, छाया वेताळ, सुनीता बरथुने, आगा खान, अनिल पोलकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, के. एम. फालक, यू.जी. शिरसाट, शिवाजी झनझन, कंपनीचे अरनाळ घोष, राम मुंदडा, कीर्तिकेयन, जहागीरदार उपस्थित होते.४शहर अभियंता एस. डी. पानझडे म्हणाले, बल्क वॉटर आणि हायड्रोक्लोरिक वर्क या दोन वेगळ्या बाबी आहेत. कंपनीने ही दोन्ही कामे वेगवेगळी केल्यास अडचण येणार नाही. यापुढील सर्व बैठकींना कंपनीचे प्रमुख अशोक अग्रवाल यांना उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले. पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची कारणे शोधावीत. तसेच कंपनीच्या मुंबई आॅफिसचे सर्वाधिकार येथील आॅफिसला देण्यात यावेत. शहरातील नवीन २३ जलकुंभांच्या जागा निश्चित करून त्या अंतिम केल्यावर डीपीआर मंजुरीकडे लक्ष देण्यात यावे. डीपीआर प्लॅनच्या मंजुरीअभावी काम सुरू करण्यास उशीर होतो आहे, असे कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितले.
मनपाचे अधिकारीच समन्वय ठेवत नाहीत
By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST