औरंगाबाद : शहरातील मोबाईल टॉवर्स कंपन्यांकडे ९ कोटी रुपयांचा कर थकल्यामुळे ६१ मोबाईल टॉवर्सला सील करून ते ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे आज बहुतांश भागात मोबाईल नेटवर्क जाम झाले होते. ६ प्रभागांमध्ये एकाच वेळी मोहीम सुरू करण्यात येणार आल्यामुळे मोबाईलधारकांचे ‘नेटवर्क’ जाम झाले. जीटीएल, रिलायन्स, वोडाफोन, आयडिया, एअरसेल, व्होम या कंपन्यांचे टॉवर सील करण्यात आल्याचे करसंकलन अधिकारी शिवाजी झनझन यांनी सांगितले. वोडाफोन, इंडस, एअरटेल कंपन्यांच्या प्रतिनिधींनी आज १ कोटी ८६ लाख रुपये भरले असून आजवर अडीच कोटी रुपयांचा कर पालिकेला जमा झाल्याचे झनझन यांनी सांगितले. ढोबळ आकडेवारीनुसार शहरात साडेनाऊ लाख मोबाईलधारक आहेत. एका मोबाईल टॉवरवर ३ ते ५ कंपन्यांचे नेटवर्क असते. एका टॉवरवरून प्रत्येक कंपनीच्या कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त ७०० ग्राहकांना नेटवर्कची ‘रेंज’ मिळते. त्यामुळे एका टॉवरवर साधारणत: २ हजार ५०० मोबाईलधारकांचे नेटवर्क इन व आऊट केले जाते.आयुक्तांच्या परवानगीने निर्णयअनधिकृत वसाहतींमधील अनधिकृत इमारतींवर अनधिकृत टॉवर्स उभारण्यात आले आहेत. ६१ टॉवर सील केले असून, त्यांचे सील आयुक्तांच्या परवानगीनेच काढण्यात येतील, असे अधिकारी झनझन यांनी सांगितले. मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी धनादेश जमा करीत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ते प्रमाण वाढेल, असा दावा त्यांनी केला. शहरात एकूण ३७५ टॉवर्स असून, त्यामध्ये ४७ टॉवर्स अधिकृत आहेत. ३२८ पैकी ६१ टॉवर्सची यंत्रणा मनपाने ताब्यात घेतली आहे.
महानगरपालिकेने केले ६१ मोबाईल टॉवर सील
By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST