परतूर : तालुक्यातील पाटोदा माव गावाजवळ मोटरसायकल व बैलगाडी यांच्यात झालेल्या अपघातात मोटार सायकल चालक जागीच ठार झाला तर मागे बसलेल्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. या अत्यवस्थ शाळकरी मुलींना औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे. पाटोदा माव येथील मयत मारोती संताराम कादे (३८) २२ मार्च रोजी परतूरहून मयुरी कादे व तिची मैत्रीण मनीषा खवल यांना घेऊन गावाकडे येत होते. परतूर-पाटोदा रोडवर गावानजीकच सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतातून अचानक एक बैलगाडी रस्त्यावर आली. या बैलगाडीवर भरधाव मोटार सायकल आदळली. यात दुचाकीचालक मारोती कादे हे जागीच ठार झाले. मागे बसलेल्या दोन्ही सोळा वर्षीय मुली गंभीर जखमी झाल्या. या मुलींची प्रकृती अत्यवस्थ असून औरंगाबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमी मुली दररोज परतूर येथे दहावीची परीक्षा देण्यासाठी येत होत्या. मयत कादे हे एकुलते एक होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
मोटर सायकल-बैलगाडीचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 00:42 IST