केवळ तंत्रज्ञानावर भर : नेटवर्क कोलमडले, खबऱ्यांचा खर्चही परवडेना यवतमाळ : दरदिवशी दाखल होणारे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना आता केवळ आधुनिक तंत्रज्ञान आणि विशेषत: मोबाईल लोकेशनचाच तेवढा आधार उरला आहे. कारण पोलिसांकडे कधीकाळी असलेले खबऱ्यांचे नेटवर्क केव्हाच कोलमडले आहे. त्यासाठी या खबऱ्यांचा न परवडणारा खर्च हे कारण पोलिसांकडून सांगितले जाते. प्रत्येकच गावाचे, शहराचे भौगोलिक क्षेत्र, लोकसंख्या वाढली आहे. पर्यायाने तेथील वर्दळही वाढली. उद्योग-व्यवसायांमुळे बाहेरगाववरून येणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. त्यासोबतच गुन्हेगारीही वाढली आहे. खून, मारामाऱ्या, चोऱ्या, घरफोड्या, दरोडे यासारखे गुन्हे जणू नित्यनेमाचेच झाले आहेत. हे गुन्हे करताना चोरटेही आधुनिक तंत्रज्ञानावर नजर ठेऊन असतात. सध्या कोणताही गुन्हा घडला की पोलिसांचा संपूर्ण तपास शक्यतोवर मोबाईल लोकेशनवर केंद्रीत असतो. अलीकडच्या काळात मोठ्या गुन्ह्यांच्या झालेल्या डिटेक्शनला मोबाईलचाच आधार लाभला आहे. एखाद्या गुन्हेगाराने सावधगिरी म्हणून गुन्ह्याच्यावेळी मोबाईल स्विच आॅफ केला असेल तर हा गुन्हा उघडकीस आणताना पोलिसांच्या नाकीनऊ येतात. अनेकदा असे गुन्हे उघडकीसच येत नाही. ‘फायनान्स एक्सपर्ट’शिवाय आर्थिक गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखेतही अशी स्थिती आहे. नियमित खून, दरोड्याचा तपास करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांच्या अपहाराच्या गुन्ह्यांचा तपास करावा लागत आहे. फायनान्स, वाणिज्य, अकाऊन्टचे पुरेसे ज्ञान नसल्याने हा तपास कुठून सुरू करावा, असा पेच या अधिकाऱ्यांपुढे निर्माण होतो. त्यामुळे अनेक महिने कागदपत्रांचे हे गठ्ठे तपासाच्या प्रतीक्षेत तसेच पडून राहतात. असाच एक तपास नुकताच ‘सीआयडी’ला वर्ग झाला. परंतू तेथेही आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कारण सीआयडीचे आर्थिक गुन्ह्याशी संबंधित एक्सपर्ट पुण्यात बसतात. तपास मात्र यवतमाळात करावा लागत आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञ ठरतात ‘फॉर्मलिटी’ मोठा गुन्हा असेल तर फॉर्मलिटी म्हणून पोलीस हे श्वान पथक, ठसे तज्ज्ञांना पाचारण करतात. परंतु ते चोरट्यांचा माग काढण्यात ‘नेहमीप्रमाणे’ अपयशी ठरतात. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून गुन्हा उघडकीस आणण्यास मदत झाल्याची उदाहरणे अगदीच नगण्य आहेत. (जिल्हा प्रतिनिधी) माहितगार साईडला, नवखे शाखांमध्ये गुन्हेगारी वर्तूळातील सदस्यांची इत्त्थंभूत माहिती ठेवणार, त्यांची तोंडओळख असलेले पोलीस कर्मचारी गुन्हे शाखा, डीबी स्कॉड, विशेष पथके येथे नेमणुकीस असणे अपेक्षित आहे. या अनुभवी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात नवे पोलीस कर्मचारी गुन्हेगारी क्षेत्रातील ‘माहितगार’ म्हणून तयार होणे क्रमप्राप्त ठरते. परंतु प्रत्यक्षात आजच्या घडीला डिटेक्शन करणाऱ्या महत्त्वाच्या शाखांमध्ये या ‘माहितगार’ कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. नवखे कर्मचारी या शाखा सांभाळत आहेत. शहराची माहिती असलेले ग्रामीणमध्ये, तर ग्रामीणची माहिती असलेले शहरात सेवा देत असल्याची विसंगती पाहायला मिळते. शासनाच्या ‘एकाच ठिकाणी सहा वर्षे’ या नियमावलीमुळे अनेकदा प्रशासनाचाही नाईलाज होतो. अशावेळी ‘माहितगार’ कर्मचाऱ्यांना संलग्नतेसाठी ‘ड्यूटी पास’चा आधार घ्यावा लागतो. पोलिसांनाच ठेवावी लागते खबऱ्यांची बडदास्त ! पूर्वी गुन्हेगारांची माहिती काढण्यासाठी त्यांच्यातच खबरे पेरण्याची परंपरा पोलीस दलात होती. परंतु आता पोलिसांचे खबऱ्यांचे हे नेटवर्कच कोलमडले आहे. खबऱ्यांचे हे नेटवर्क सांभाळणे जिकरीचे आणि खर्चिक बाब झाल्याचे पोलीस सांगतात. क्राईम ब्रँच अथवा डीबी स्कॉडमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांचे गट असतात. एका गटाचा कुणी खबऱ्या असेल तर दुसरा गट त्या खबऱ्याला टार्गेट करतो. गुन्ह्यात अडकविण्याच्या भीतीने मग हे गुन्हेगार पोलिसांना खबर देणे टाळतात. पूर्वी १००-२०० रुपये खबरींसाठी पुरेसे होते. परंतु आता बडदास्त ठेवावी लागते. ही बडदास्त ठेवणे पोलिसांना पगारातून शक्य होत नसल्याचे पोलीस खासगीत सांगतात.
गुन्हे तपासाला मोबाईल लोकेशनचाच आधार
By admin | Updated: July 27, 2016 00:24 IST