औरंगाबाद : प्रति जेजुरी असलेली सातारा खंडोबा यात्रा २७ नोव्हेंबरला असून, चंपाषष्टीला मराठवाड्यातील तांडा, वाडी, वस्त्यांसह खेड्यापाड्यातून लाखो भाविकांची गर्दी ओसंडते. परिसरातील मोकळी जागा यात्रेसाठी उपलब्ध करून देत सेवा- सुविधा पुरवाव्यात, असे साकडे सातारा- देवळाई नगर परिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे मंदिर ट्रस्टी व नागरिकांनी घातले आहे.अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला आहे. साताऱ्यासह शहराचे कुलदैवतही मानले जाते. पुरातन मंदिर असल्याने या मंदिराचा समावेश शासनाने तीर्थस्थळांत झाला असल्याने मंदिराचा कारभार आता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत: देखरेख केली जाते. पुरातन मंदिराची रचना दीपमाळीची तुटफूट होत असून, त्याची डागडुजीही यात्रेअगोदर करावी, यासाठी ट्रस्ट व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. खंडोबाच्या मूर्तीच्या डोळ्यावर तडे गेल्याने भाविक व ग्रामस्थांनी डोळे बदलण्याची सतत मागणी केल्यानंतर मंदिरातील दोन्ही मूर्तींचे डोळे ट्रस्टने यंदा बदलले असून, मंदिरावर सीसीटीव्हीची नजरही लावली आहे. त्यामुळे मंदिर सुरक्षित झाले आहे; परंतु मंदिराच्या विटांचे बांधकाम ठिसूळ झाले असून, त्यावर मुलामा चढविण्याची मागणी जोर धरीत आहे. यात्रेसाठी जागा उपलब्ध करामराठवाड्यातून भाविक दर्शनासाठी येतात, यात्रेसाठी मंदिराशेजारील सर्व जागेवर उंच उंच इमारती उभ्या राहिल्याने यात्रेकरूंना थांबण्यासाठी जागाच उपलब्ध राहिलेली नाही. खाजगी जागा नगर परिषदेने यात्रेसाठी उपलब्ध करून द्यावी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पथदिवे, रस्ते दुरुस्ती, आरोग्यसेवा, पोलीस यंत्रणा इत्यादी विषयांवर नगर परिषद प्रशासक विजय राऊत यांना निवेदन देऊन ट्रस्ट अध्यक्ष गोविंद चोपडे, सचिव मोहन पवार, साहेबराव पळसकर, समाजसेवक सोमीनाथ शिराणे, आबा चव्हाण, डॉ. संजय साळवे, दिलीप दांडेकर, विजय धुमाळ, नंदकुमार दांडेकर, दिलीप धुमाळ, सुभाष पारखे, किशोर पारखे, किशोर सोनवणे आदींनी केली आहे. एमआयटी रस्ता दयनीयएमआयटी ते मंदिरापर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तीन आठवड्यांवर यात्रा येऊन ठेपली आहे. भाविकांना आदळआपट करीत मंदिर गाठावे लागते. नगर परिषदेने याविषयी तात्काळ नियोजन करून रस्त्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी एम.बी. पटेल यांनी केली आहे. वर्षभर मंदिरात दर्शनासाठी औरंगाबाद जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातून भाविकांची गर्दी होत असते. यात्रेनिमित्त पूर्वी महिनाभर आधीपासूनच गर्दी असायची; परंतु आता खेड्यापाड्यांतून बैलगाडीने येणाऱ्यांची संख्या रोडावली असून ट्रॅक्स, सुमो, कार, टेम्पो अशा वाहनांतून भाविक येथे येतात. येथे भाविकांना थांबण्यासाठी मोठी जागा शिल्लक नसल्याने मुक्काम न करता त्याच दिवशी ते परत निघून जातात. आता यात्रेत मनोरंजनात्मक कार्यक्रम होत नाहीत. धार्मिक कार्यक्रम आटोपून नाइलाजाने भाविक माघारी निघून जातात. त्यामुळे यात्रेत मिळणारा महसूलही बुडतो, अशी खंत ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.प्रशासक तथा तहसीलदार विजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ग्रामपंचायत ज्या पद्धतीने यात्रेसाठी नियोजन करीत होती त्याच प्रकारे नगर परिषदसुद्धा सेवा-सुविधा पुरविणार आहे. नगर परिषदेची ही पहिलीच यात्रा असून, डागडुजी व नियोजनाच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
खंडोबा यात्रेत येणार लाखेंचा जनसमुदाय
By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST