लातूर : गणरायाचे विसर्जन सोमवारी होणार असल्याने रविवारी मनपा प्रशासन व पोलिस दलाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर मंदिरातील तीर्थकुंडात मनपा प्रशासनाने टँकरने पाणी सोडले आहे. तर देवस्थान समितीच्या वतीने तीर्थकुंडात विंधन विहिरीच्या सहाय्याने रविवारी दिवसभर पाणी सोडण्यात आले आहे. मुख्य मार्गावरून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघणार असल्यामुळे पीव्हीआर चौक ते गंजगोलाई, विवेकानंद चौक हा मुख्य मार्ग सोमवारी दिवसभर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.महानगरपालिकेच्या वतीने श्री सिद्धेश्वर व श्री रत्नेश्वर येथील तीर्थकुंड, बांधकाम भवन येथील विहीर, शासकीय वसाहतीतील विहीर, हरंगुळ रोडवरील चव्हाण यांची विहीर तसेच साई रोड येथील तिवारी यांची विहीर व कव्हा येथील तलावात गणेश विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी वीज, बॅरिकेटस्, पोहणारी व्यक्ती, आवश्यक त्या ठिकाणी क्रेनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी सांगितले. मनपा कार्यालयात आयुक्त सुधाकर तेलंग यांच्या उपस्थितीत रविवारी कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत गणेश विसर्जनाच्या ठिकाणांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गणरायाला आज निरोप
By admin | Updated: September 8, 2014 00:55 IST