बीड : येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला नगराध्यक्षांकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत बुधवारी काकू-नाना विकास आघाडीचे नगरसेवक उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना भेटले.नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १७ जानेवारी रोजी झाली होती. दर दोन महिन्यांनी सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहे. मात्र, तीन महिने उलटूनही सभा न झाल्यामुळे शहरातील विकास कामांमध्ये अडथळा येत असल्याचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर म्हणाले. धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सर्वसाधारण सभा होणे आवश्यक आहे. नगराध्यक्ष जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.सर्वसाधारण सभा घ्यायची नसेल तर उपनगराध्यक्षांना स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावेत, अशी मागणी सभापती अमर नाईकवाडे, फारूक पटेल, मोमीन अझहरोद्दीन यांनी लावून धरली. यावेळी नगराध्यक्षांवर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करण्यात आली.नगरसेवक रमेश चव्हाण, युवराज जगताप, राजेश क्षीरसागर, विशाल घाडगे, किशोर पिंगळे, खान जैतुल्ला, बाळासाहेब गुंजाळ, शेख इकबाल, बिभीषण लांडगे, सईद चाऊस, गणेश तांदळे, सोनू जावरीवाले, हाफीज अश्पाक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आघाडीचे नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला
By admin | Updated: April 6, 2017 23:15 IST