हद्दवाढविरोधी कृती समिती : कोल्हापूर शहर म्हणजे कुपोषित बालकसरकारनेच हद्दवाढ करावीकोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका ही शहराचा विकास करण्यात अपयशी ठरली असल्याने त्यांनी हद्दवाढ करण्याचा हट्ट सोडण्याची मागणी करीत आज, शुक्रवारी शासनाची समिती कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार असल्याने या दिवशी हद्दवाढीतील प्रस्तावित सर्व १८ गावांनी सर्व व्यवहार कडकडीत बंद ठेवण्याचा निर्धार हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या बैठकीत करण्यात आला.हद्दवाढीबाबत शासनाची द्विसदस्यीय समिती आज, शुक्रवारपासून दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर हद्दवाढविरोधी कृती समितीच्या वतीने गुरुवारी शासकीय विश्रामगृहावरील राजर्षी शाहू सभागृहात प्रस्तावित हद्दवाढीतील १८ गावांतील प्रमुखांची ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार हे होते. बैठकीस आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, भगवान काटे आदी उपस्थित होते. हद्दवाढ करताना शासन कोणाच्या तरी दडपणाखाली निर्णय घेत असेल तर टोलपेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार नरके यांनी दिला. आम्ही शहराच्या विकासाआड कधीही येणार नाही. शासनाच्या समितीने गावांतील लोकभावना समजून घ्याव्यात, असेही त्यांनी आवाहन केले. भाषणात माजी आमदार संपतराव पवार-पाटील म्हणाले, आज, शुक्रवारी सर्व गावांत बंद कडकडीत पाळू. समितीसमोर परिपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करू. गेल्या ४२ वर्षांत ‘ढपला’ संस्कृतीमुळे कोल्हापूर शहर हे बालकांसारखे कुपोषितच राहिले आहे. आणी यापुढेही यात कांही फरक पडेल अशी आशा नाही. शासनाची समिती गावोगावी भेट देणार असेल तर तेथील सरपंचांनी आपला विरोध मांडावा.या बैठकीत विरोधी कृती समितीचे निमंत्रक नाथाजी पोवार, मुडशिंगीचे सरपंच तानाजी पाटील, गोकुळ शिरगावचे सरपंच एम. एस. पाटील, कळंबाचे विश्वास शिंदे, शिरोलीचे गोविंद घाटगे, उचगावचे अनिल शिंदे, बालिंगाचे मधुकर जांभळे, शरद मिराशी, गोकुळ शिरगावचे माजी सरपंच बाबूराव पाटील, राजू माने, आदींनी विचार मांडले. बी. ए. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)हद्दवाढ समर्थनार्थ बैठक : भांडणे लावण्याचे बंद कराकोल्हापूर : कोणत्याही शहराची हद्दवाढ करण्याचा अधिकार हा राज्य सरकारचा असल्याने कोल्हापुरातील जनतेमध्ये शहरी आणि ग्रामीण अशी भांडणे लावण्याचे बंद करून स्वत:च्या अधिकारात राज्य सरकारने हद्दवाढीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन गुरुवारी महानगरपालिका सभागृहात झालेल्या बैठकीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर अश्विनी रामाणे होत्या. हद्दवाढ झालीच पाहिजे, हा आमचा हट्ट असून त्यासाठी संघर्ष करण्याची शहरवासीयांची तयारी आहे, असा इशारा बैठकीत देण्यात आला. शहराची हद्दवाढ ही शास्त्रीय तसेच तांत्रिक मुद्द्यांवर आधारलेली असून राज्य सरकारच्या समितीला ती पटवून देण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. कोल्हापूर महानगरपालिका सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये राज्य सरकारच्या समितीसमोर कोणी कशा पद्धतीने शहरवासीयांच्या बाजू मांडायची याचे नियोजन आज, शुक्रवारी माजी महापौर आर. के. पोवार यांनी करावे आणि त्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात, असे यावेळी ठरले. त्यामुळे आज, शुक्रवारी नियोजनाची बैठक होणार आहे. आर. के. पोवार म्हणाले, गेली ४३ वर्षे हद्दवाढीसाठी भांडत असताना त्याला विरोध होत राहिला. जर हा विरोध यापुढेही कायम राहणार असेल तर ग्रामीण भागाच्या सुविधा बंद कराव्यात.अॅड. बाबा इंदूलकर म्हणाले, आमची जी मागणी आहे, त्याला आर्थिक कारणे नाहीत तर शास्त्रीय कारणे आहेत. सन १९४६ पासून आतापर्यंत एक इंचाने हद्दवाढ झाली नाही. ६६.८४ चौरस किलोमीटर परिघातील शिवाजी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, राजाराम कॉलेज, पोलीस मुख्यालय, आरटीओ, एस. टी. महामंडळाच्या जागा वगळल्या तर केवळ १५ चौरस किलोमीटर क्षेत्रात रहिवास क्षेत्र उरते. त्यामुळे मुंबईपेक्षा कोल्हापूर शहराची लोकसंख्येची घनता जास्त आहे म्हणूनच हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून हट्ट आहे.नगरसेविका सूरमंजिरी लाटकर म्हणाल्या, कोणत्याही शहराची हद्दवाढ करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा अधिकार आहे. सरकारने वास्तव आणि तांत्रिक मुद्दे विचारात घेऊन तातडीने हद्दवाढ करावी.राजेश लाटकर यांनी सरकारने ग्रामीण व शहरी अशी झुंज लावण्याचे बंद करावे, दुजाभाव न करता लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी प्रल्हाद चव्हाण, महेश जाधव, अॅड. राजेंद्र मोरे, अॅड. विवेक घाटगे, सतीश कांबळे, संदीप देसाई, पंडितराव सडोलीकर, लाला गायकवाड, विजय सूर्यवंशी, बजरंग शेलार आदींनी सूचना केल्या. (प्रतिनिधी)विधिमंडळासमोर उपोषण पावसाळी अधिवेशनापूर्वी जर सरकारने हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतला नाही, तर विधिमंडळासमोर आपण आमरण उपोषण करू, असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिला. हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया आहे तरीही त्याला विरोध केला जात आहे. राजकीय प्रतिष्ठा निर्माण झाली असल्याचे दिसते. ग्रामीण भागाचा संभ्रम निर्माण झाला असून तो दूर करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. शहरात गावे आली की त्यांचा विकास होईल हे ग्रामीण जनतेला पटवून दिले पाहिजे, असेही क्षीरसागर म्हणाले.
एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची शिवाजीनगरात रेल्वेखाली आत्महत्या
By admin | Updated: June 17, 2016 00:37 IST