औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघासह राज्यातील इतर मतदारसंघांत महाविकास आघाडीचा एकच उमेदवार देण्याचा निर्णय तिन्ही घटक पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत झाला. विद्यमान आमदार ज्या पक्षाचा त्यासाठीच जागा सोडण्याच्या धोरणानुसार औरंगाबाद विभागातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सर्व मदत करणार आहेत.
या धोरणामुळे शिवसेनेतील इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरले गेले. काही इच्छुकांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली होती; परंतु आता महाविकास आघाडीचा निर्णय झाल्याने त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असे चित्र निवडणुकीत असणार आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघ सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. सोबत काँग्रेस आणि शिवसेना आहे. इतर जागांबाबत देखील असाच फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघात शिवसेनेने आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत उमेदवार दिले; परंतु यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या सूचना -
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत असणार आहे.
गायकवाड यांच्यासह सहा जणांचे अर्ज दाखल
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत माजी खा.जयसिंगराव गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सहा उमेदवारांनी मंगळवारी विभागीय आयुक्तालयात अर्ज दाखल केले. आजवर ११ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी डमी अर्ज दाखल केला. ते १२ नोव्हेंबर रोजी पुन्हा उमेदवारी अर्ज भरणार आहेत, तर आ. सतीश चव्हाण हेदेखील १२ रोजीच अर्ज दाखल करणार आहेत. उद्या बीडचे भाजपाचे माजी जिल्हाप्रमुख रमेश पोफळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. जयसिंगराव गायकवाड (अपक्ष) औरंगाबाद, आशिष देशमुख (अपक्ष, ता. जि. बीड), प्रवीणकुमार पोटभरे (अपक्ष, बीड), भारत फुलारे (अपक्ष, औरंगाबाद), अॅड. डॉ. यशवंत कसबे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी परभणी, शिरीष बोराळकर, भाजप औरंगाबाद यांनी प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविली.