माजलगाव : धरण परिसरात एका २९ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने बुधवारी खळबळ उडाली. त्या महिलेचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.गोदावरी सुरेश उणवने असे त्या मयत महिलेचे नाव आहे. ती खानापुर येथील रहिवाशी असून, बचत गटाचे काम करत होती. तिला दोन मुले आहेत. गोदावरी हिने दोन दिवसांपुर्वी मुलांना शिक्षणासाठी अंबाजोगाई येथे सोडले व तेथून बहिणीकडे मुकामी थांबली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी माजलगावला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली मात्र सांयकाळी घरी आलीच नाही. धरण परिसरातील एका खड्यात तिचा मृतदेह आढळला. महिलेची ओळख पटल्याने नागरिकांनी तिच्या आईवडिलांना कळवले. वडील तुकाराम घोडके यांनी ठाण्यात खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिची पर्स, चप्पल व सुतळी आढळून आली. पोलिस उपनिरीक्षक एस.एस.देवकरे यांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेला. याप्रकरणी शहर ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)
माजलगावमध्ये महिलेचा खून ?
By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST