लातूर : अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील तीन महिलांना वाटेत अडवून मारहाण करीत चौघांनी दागिने लुटल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी फिर्यादीवरून किनगाव पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील चिखली येथील अहिल्याबाई चाटे, गिरिजाबाई चाटे, अंजनाबाई चाटे या महिला केंद्रेवाडी शिवारातून सोनखेड-मानखेडकडे जाणाऱ्या रस्त्याने आपल्या शेताकडे जात होत्या. दरम्यान, केंद्रेवाडी शिवारात अंकुश चामे, लहू चामे, अक्षय चामे आणि मधुबाला चामे (सर्व रा. चिखली) यांनी रस्त्यात अडवून या तीन महिलांना जबर मारहाण केली. या मारहाणीत महिलेचे डोके फोडले. गळ्यातील सहा ग्रॅमच्या सोन्याची पोत हिसकावून पळविले. घाबरलेल्या महिलांनी या घटनेची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. या प्रकरणी राजेंद्र भानुदास चाटे (रा. चिखली) यांच्या फिर्यादीवरून अंकुश चामे यांच्यासह अन्य तिघाविरोधात किनगाव पोलीस ठाण्यात कलम १४३, १४७, १४८, ३४१, ३२७, ३२४, ३२३, ५०४, ५०६ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास किनगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ तलेदवार हे करीत आहेत. महिलांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चिखली परिसरात खळबळ उडाली आहे.
मारहाण करून दागिने लंपास
By admin | Updated: January 7, 2017 00:09 IST