वडवणी : भगवानगड असो वा भगवानबाबाचा नारळी सप्ताह असो, या ठिकाणी राजकीय नेत्यांपेक्षा भाविक महत्त्वाचे आहेत, अशी स्पष्टोक्ती भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना केली. कोठरबन येथे सुरू असलेल्या नारळी सप्ताहाच्या व्यासपीठावर नेत्यांना प्रवेश नसल्याचेही त्यांनी सांगितलेकोठरबन येथे ८३ व्या नारळी सप्ताहास दोन दिवसापूर्वीच सुरू झाला आहे. संपूर्ण परिसरात भक्तीमय वातावरण पसरले आहे. भगवानगडाचे मठाधिपती नामदेवशास्त्री हे गावात असून दररोज दुपारी ४ ते ६ या वेळेत ज्ञानेश्वरी भावनिरोपण करतात. यासाठी राज्यभरातून भाविकांनी गर्दी केली आहे. सप्ताहासाठी ग्रामस्थांनी ६० लाख रूपयांची वर्गणी जमा केली आहे.नामदेव महाराज शास्त्री म्हणाले की, संप्रदाय हा राजकीय नेत्यांपासून अलिप्त राहणार आहे. सप्ताहानिमित्त येणारे सर्व भगवानबाबांचे भक्त असतात. भगवानगडावर राजकीय व्यासपीठाला बंदी घातल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नामदेव महाराज शास्त्रींच्या भूमिकेला ग्रामस्थांनीही पाठिंबा दर्शविला आहे. (वार्ताहर)
नेत्यांपेक्षा भाविक महत्त्वाचे
By admin | Updated: April 22, 2016 00:34 IST