औरंगाबाद : शहरातील हर्सूल परिसर आणि जटवाडा रोड येथील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी लोकमत आपल्या दारी या मोहिमेच्या माध्यमातून लोकमत चमू सोमवार, दि. २ मार्च रोजी सकाळी ९ वा. राधास्वामी कॉलनी, सत्संग हॉल, जटवाडा रोड येथे नागरिकांशी संवाद साधणार आहे. यावेळी नागरिकांना रस्ते, पाणी, स्वच्छता, ड्रेनेज, शौचालय आदी प्रश्न लोकमत चमूसमोर मांडता येणार आहेत. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे शहराशेजारी असणाऱ्या परिसरात नागरी वसाहतीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. येथील नागरिकांच्या प्रश्नाकडे महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी कानाडोळा करीत असल्यामुळे त्या वसाहतींमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त असून, नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लोकमतने ‘लोकमत आपल्या दारी’ ही मोहीम हाती घेतली आहे.‘लोकमत आपल्या दारी’च्या माध्यमातून शहराच्या विविध भागांतील नागरिकांच्या समस्यांना लोकमतने वाचा फोडली आहे. सातारा-देवळाई आणि वाळूज महानगरानंतर आता लोकमत आपल्या दारी सोमवारपासून जटवाडा परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेत त्यांना वाचा फोडणार आहे.
लोकमत आपल्या दारी उद्यापासून
By admin | Updated: March 1, 2015 00:09 IST