बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला. यामुळे जिल्ह्यातील आठ लाख पशुधनास मोठा आधार निर्माण झाला आहे.पावसाने दडी मारल्यानंतर जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले होते. ही संधी असल्याचे काही जणांनी मानत कडबा दुपटीने विक्री करण्यास सुरूवात केली होती. काही दिवसांपूर्वी कडब्याचे दर १४०० रूपये शेकडा होते तर त्यानंतरच्या १५ दिवसांच्या कालावधीत हे दर जवळपास अडीच ते तीन हजारांवर जाऊन पोहोचले होते. यामुळे पशूधन वाचविणे शेतकऱ्यांना मोठे अवघड बनले होते. वाळला चारा महाग असल्यामुळे जनावरांना ओला चारा दिला जात होता. जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत विभागीय आयुक्तांनी शासनाकडे आपला अहवाल सादर केला होता. जनावरांच्या छावणीत किमान ५०० व कमाल तीन हजार जनावरे ठेवण्यात येतील. त्यामुळे पशुपालकांना आता छावणीत मुक्काम करावा लागणार आहे.वेळोवेळीच्या परिस्थितीचे आकलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चारा छावणीचा निर्णय घेण्यात येईल. प्रत्येक जनावरांच्या मालकांना त्यांच्याकडे असलेल्या जास्तीत जास्त पाच जनावरांपर्यंत (लहान व मोठे) मर्यादीत असेल. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीने सहकारी साखर कारखाने, सहकारी खरेदी विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समित्या, दूध खरेदी विक्री संघ यांच्यासारख्या संस्थामार्फत गुरांच्या छावण्या सुरू होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजपचे भाई गंगाभीषण थावरे यांनी चारा डेपो, छावण्यांसाठी स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायतपुढे गुरे बांधून निषेध नोंदविण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी २१ आॅगस्ट रोजी माजलगाव तहसीलने बैठक बोलावली होती. आता ही बैठक २२ रोजी होणार असल्याचे सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)जिल्ह्यात ८ लाख २२ हजार ३६४ जनावरे आहेत. मोठ्या गुरांची संख्या ५ लाख ९६ हजार ७०७ तर लहान गुरांची संख्या २ लाख २५ हजार ६५७ एवढी आहे. या गुरांना दररोज ४२५७ मेट्रीक टन चारा आवश्यक आहे. चारा संपल्यामुळे शेतकऱ्यांनी उसाचे फड गुत्ते घेऊन उसासह वाढे दावणीत टाकणे सुरू केले होते. त्यामुळे उसालाही चांगला भाव आला होता. पशुपालक मात्र मेटाकुटीला आले होते. छावण्यांनी दिलासा मिळणार आहे.
पशुधनास चारा छावण्यांचा आधार
By admin | Updated: August 21, 2015 00:44 IST