लाडसावंगी : सध्या रबी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी जिवाचा आटापिटा करीत आहे. मात्र, नादुरुस्त रोहित्रामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. महावितरण कंपनीकडून वेळेवर रोहित्र दुरुस्ती होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांना फटका बसत आहे. किरकोळ फाॅल्ट झाला तरी तासनतास वीज गायब होते. महावितरणचे कर्मचारी सध्या वीज बील वसूलीत व्यस्त आहेत. तर किरकोळ दुरुस्तीसाठी शेतकरी आपला जीव धोक्यात घालत असल्याची परिस्थिती सध्या परिसरात दिसत आहे.
सध्या रब्बी हंगामाच्या पिकांना पाणी भरण्यासाठी शेतकरी रात्रंदिवस काम करीत आहे. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. रोहित्र किंवा विजेच्या खांबावर छोटा मोठा बिघाड झाला तरी, महावितरणचा कर्मचारी यासाठी उपलब्घ होत नसल्याने तासंतास विजपुरवठा खंडीत राहतो. डोळ्यासमाेर उभे पिक वाया जात असल्यामुळे अनेक शेतकरी आपल्या अल्पज्ञानाच्या भरवशावर जीव धोक्यात घालून रोहित्रातून वीजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे धोकादायक असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. याप्रकरणाचे महावितरण कंपनीला कसलेही सोयर सुतक दिसत नाही. त्यांचे कर्मचारी सध्या वसूलीत व्यस्त आहेत. शेतकऱ्यांनी तक्रारी करुनही कोणी दखल घेत नाहीत. वरिष्ठांनी दखल घेऊन आखंडीत विज देण्याची मागणी जि.प. सदस्य सुरेश शिंदे, प.स. सदस्य अर्जुन शेळके, सरपंच सुदाम पवार, रमेश शिंदे, भगवान साळवे, संजय भालेराव आदींनी केली आहे.
फोटो कप्शन : लाडसावंगी येथील शेतकरी जिव धोक्यात घालून डि.पी.ची अशी दुरुस्ती करावी लागत आहे.
चौकट
कोणी फोनही घेत नाहीत
लाडसावंगी परिसरात सध्या कोठेही रोहित्रात बिघाड झाला तर, तासंतास वीज गायब होते. यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अनेकजण महावितरण कार्यालयात फोन करतात. मात्र, तेथे कोणी फोनही उचलत नाहीत. यामुळे शेतकरी स्वत: जीव धोक्यात घालून रोहित्रातील बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतात. आधीच एक आठवडा दिवसा आठ तास तर एक आठवडा रात्री दहा तास विज मिळत आहे. त्यात सतत लपडाव व शुक्रवारी दिवसभर विज खंडीत राहात असल्यामुळे रब्बीच्या पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे.
फोटो : लाडसावंगी परिसरात रोहित्रात बिघाड झाल्यामुळे महावितरणचा कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी स्वत: जीव धोक्यात घालून विजपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहे.