करमाड : बनगाव तलाव यावर्षी कोरडा आहे. तर करमाडजवळील हिवरा पाझर तलावात पुरेसा साठा आहे; परंतु या तलावातून पाण्याचा उपसा चालू असल्याने करमाड येथे भीषण पाण्याची टंचाई जाणवणार आहे. यावर्षी औरंगाबाद तालुक्यात पाऊस अत्यंत कमी पडला आहे. त्यामुळे करमाड व परिसरात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. करमाड येथील ग्रामपंचायतीने याबाबत जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, करमाड गावाची लोकसंख्या जवळपास दहा हजार आहे. दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे करमाड परिसरातील औद्योगिक वसाहतीमुळे मजुरांची संख्या वाढत चालली आहे. तसेच भाडेकरू कुटुंबांची वाढ होत आहे. सद्यपरिस्थितीतील हिवरा पाझर तलावात पाणीसाठा आहे. परंतु या परिसरातील शेतकरी पाण्याचा उपसा करीत असल्याने ग्रामपंचायतीच्या विहिरीचा पाणीसाठा कमी होत आहे. त्यामुळे करमाड येथे पाणी टंचाई आतापासून जाणवत आहे. त्यामुळे हिवरा तलाव व लहुकी मध्यम प्रकल्प येथील लाभक्षेत्रातील खाजगी विहिरी कायमच्या बंद करून पाणीसाठा राखीव ठेवावा, नसता करमाड ग्रामपंचायतीअंतर्गत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच कैलास कैलास उकर्डे, सदस्य शेख रफ्किभाई, विठठ्ल कोरडे यांनी दिला आहे.
हिवरा पाझर तलावातून अवैध पाणी उपसा
By admin | Updated: December 17, 2014 00:00 IST