यंदा मान्सूनचे वेळेत आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने, शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू केली आहे. सध्या नांगरणी, मोगडणीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहेत. मागील खरीप हंगामात सुमारे ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर मका व ७५ हजार हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली होती. मात्र, बाजारात मकाला कमी भाव मिळाल्याने, मक्याचे क्षेत्र २ हजार हेक्टरने घटण्याचा विभागाचा अंदाज आहे. शेतकरी कपाशी व सोयाबीनकडे वळण्याची शक्यता गृहीत धरून सुमारे ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशी व १ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार, बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. सोयाबीनला या वर्षी चांगला भाव मिळाल्याने, काही प्रमाणात सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र, बियाणे मर्यादित असल्यामुळे शेतकऱ्यांनी घरच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चौकट
४५ हजार मे.टन खते मिळणार
या वर्षी वैजापूर तालुक्याला ४५ हजार ४२९ मे. टन खतांचे आवंटण मंजूर झाले आहे. त्यानुसार, युरिया-२४२४८ टन, डीएपी-४०७५ टन, एसएसपी-५६८४ टन, एमओपी-४५५६ टन, संयुक्त खते-२१०७८ असे ५९,६४१ मे. टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी युरिया-१८४७० टन, डीएपी-३१०४ टन, एसएसपी-४३३० टन, एमओपी-३४७० टन व संयुक्त खते-१६०५५ टन असे ४५ हजार ४२९ मे. टन खतांचे आवंटण मंजूर झाले आहे.