केटरिंगचा व्यवसाय करणारे वैष्णव कुटुंब गावाच्या बाहेर वस्तीवर झोपडी करून राहते. उकाड्यामुळे हे कुटुंब रात्री आपल्या झोपडीच्या बाहेर झोपले होते. पहाटे अचानक आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून लोकांना बोलावले व आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु भारनियमनामुळे विद्युतपुरवठा खंडित असल्याने अत्यल्प पाण्यावर आग आटोक्यात येऊ शकली नाही. यात संसारउपयोगी साहित्य, टीव्ही, फ्रीज, धान्य, किमती वस्तू व वैष्णव यांच्या केटरिंगच्या व्यवसायाचे सर्व सामान जळून खाक झाले.
ऐन लग्नसराईत वैष्णव कटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून हे कटुंब उघड्यावर पडले आहे. तहसील प्रशासनाला माहिती देऊनही रविवारी दिवसभर पंचनाम्यासाठी प्रशासनाच्यावतीने कोणीही आले नाही. वैष्णव कुटुंबाला नुकसानभरपाई मिळेल का, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल गावकऱ्यांनी तीव्र रोष व्यक्त केला.