वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात घातक सांडपाणी उघड्यावर सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करीत जोेगेश्वरी ग्रामपंचायतीने हे सांडपाणी बंद केले.जोगेश्वरी परिसरात घातक रसायनांचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या चोरी- छुपे हे सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढला आहे. कंपन्या नालीद्वारे सर्रास सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे परिसरातील जलसाठेही दूषित होत आहेत. उघड्यावर सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी जमिनीत पाझरून विहिरी, तसेच बोअरचे पाणीही दूषित झाले आहे. अनेक कंपन्यांचे सांडपाणी रामराईच्या तलावात जात असल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलावाच्या पाण्यामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला असून मत्स्यपालन व्यवसायही धोक्यात आला आहे.घातक रसायनामुळे या तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी, तसेच सिंचनासाठीही उपयोगात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एमआयडीसीच्या वतीने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी सीईटीपी प्रकल्प सुरू केलेला आहे, तरीही अनेक कारखानदार घातक रसायनयुक्त पाणी उघड्यावर सोडत असल्याचे जोगेश्वरी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे.अशा कारखान्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने २२ नोव्हेंबरपासून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
जोगेश्वरी ग्रामपंचायतीचे कडक धोरण : कंपन्यांचे सांडपाणी बंद
By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST