जामवाडी : जालना ते देऊळगावराजा या महामार्गावरील खड्ड्यांमुळे येथे दररोज अपघतांचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याची भावना वाहनचालक व्यक्त करत आहेत.जालना ते नागपूर या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र हे काम वारंवार रखडत असल्याने वाहनचालकांचे अतोनात हाल होत आहे.जालना ते देऊळगावराजा २५ किमीचे अंतर आहे. हे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. देऊळगावराजा ते जामवडी या रस्त्याचे कामही अर्धवट ठेवण्यात आले आहे. या मार्गावर जुना व नवीन असे दोन रस्ते तयार झाले आहेत.मोठी वाहने जुन्या रस्त्याचा तर दुचाकी तसेच जीप आदी वाहने नवीन मार्गावरून धावतात.यामुळे अनेकदा वाहन पुढे काढण्याच्या प्रयत्नात या रस्त्यामुळे अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर ट्रक व दुचाकी अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. यापूर्वी अनेक वाहनचालकांसह अनेकांचा मृत्यू झाला तर काहीजण कायमचे जायबंदी झाले.महामार्गाचे रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी जामवाडीसह परिसरातील अनेक गावातील ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)
जालना ते देऊळगावराजा रस्ता बनला मृत्यूचा सापळा
By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST