लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील मोंढा भागातील एका हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात फरार असलेल्या आरोपीच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री मुसक्या आवळल्या. ही कारवाई शहराजवळील आनंदवाडी शिवारातील एका हॉटेलात करण्यात आली.मोंढ्यातील हॉटेल राज व्हिलामध्ये वेटर म्हणून काम करणाऱ्या राजू नगरे (रा. शनिवारपेठ) यास अक्षय आठवलेने ८ मे रोजी साथीदारांसमवेत मारहाण केली होती. त्याच्यावर एअरगन रोखल्यानंतर मिसफायर होऊन स्वत: अक्षय आठवलेच जखमी झाला. राजू नगरे याच्या फिर्यादीवरुन पेठ बीड ठाण्यात अक्षय शाम आठवले, सनी शाम आठवले (दोघे रा. माळीवेस) व सागर उर्फ विक्की जाधव व अन्य एकावर गुन्हा नोंद झाला होता. सागर जाधव व अन्य एक अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात आहेत. अक्षयवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सनी आठवले फरार होता. तो शुक्रवारी रात्री आनंदवाडी शिवारातील हॉटेलात मित्रांसोबत पार्टी करत असल्याची माहिती मिळाल्यावरुन गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी सापळा लावला. सहायक निरीक्षक शिवाजी गुरमे, एस. पी. पुंडगे, पोकॉ एस. एन. कातखडे, ए. बी. हंबर्डे, शेख जुबेर, गोरक्षनाथ मिसाळ, मोहन क्षीरसागर यांनी त्यास शिताफीने पकडले. त्याला पेठ बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याच्यासोबतच्या पाच जणांना चौकशी करुन सोडून दिले.
गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद
By admin | Updated: May 20, 2017 23:30 IST