औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर प्रचारासाठीची मुदत सोमवारी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडे प्रचारासाठी आता अवघे तीनच दिवस उरले आहेत.राज्यात विधानसभेसाठी १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणुकीची प्रक्रिया २० सप्टेंबरपासून सुरू झाली आहे. १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यापासून प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये तब्बल १५६ उमेदवार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी अनुभवायला मिळत आहे. दहा दिवसांपासून गावागावांत प्रचाराच्या तोफा गर्जत आहेत. जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रचारसभा, पदयात्रा, बैठका इ. माध्यमांचा वापर केला जात आहे. मात्र, आता हा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांकडे आता स्वत:च्या प्रचारासाठी अवघे तीनच दिवस उरले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता संपत आहे. या मुदतीनंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही. तसे आढळून आल्यास तो आदर्श आचारसंहितेचा भंग ठरेल. -संजीव जाधवर,निवडणूक निर्णय अधिकारी
प्रचाराला उरले आता अवघे तीनच दिवस
By admin | Updated: October 11, 2014 00:40 IST