बीड : कृषी विभागासाठी आलेला निधी परस्पर वळविल्याचा मुद्दा बुधवारी स्थायी समिती बैठकीत गाजला. जि.प. उपाध्यक्षा आशा दौंड यांनी निधी परस्पर वळविल्यास गय नाही, असा इशारा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.अध्यक्ष विजयसिंह पंडित, उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, कमल मुंडे यांची उपस्थिती होती. सीईओ नामदेव ननावरे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सुरुवातीलाच अंबाजोगाई येथे मराठीचे विद्यापीठ उभारण्यात यावे, असा ठराव आशा दौंड यांनी मांडला. त्यास सभापती सोनवणे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने पारित करण्यात आला. कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कडबाकुट्टी दिली जाते. त्यासाठी ४ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली होती;परंतु तत्कालीन सीईओ वसंत जाधवर यांनी हा निधी दुसरीकडेच वळविला. शेतकऱ्यांना कडबाकुट्ट्यांपासून वंचित रहावे लागले. हा निधी कृषी विभागाला परत मिळाला पाहिजे, अशी मागणी उपाध्यक्षा दौंड यांनी लावून धरली. त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची ढवळाढवळ चालणार नाही, असा इशाराही दिला. अध्यक्ष पंडित यांनी निधी पुन्हा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले. स्वाईनफ्लू बाबत उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य, एमआरईजीएस, शिक्षण यावरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)
निधी वळविल्याचा मुद्दा ‘स्थायी’मध्ये गाजला
By admin | Updated: March 5, 2015 00:04 IST