बालाजी थेटे , औराद शहाजानी राज्यात वारंवार पडणारा दुष्काळ, पावसाचे होणारे कमी प्रमाण, पाण्याची कमतरता यामुळे कमी पाण्यावर जास्त सिंचन यासाठी शेतकर्यांनी लाखो रुपये खर्चून शेतात ठिबक व तुषार सिंचन योजना राबविल्या. पण; यातील शासनाचा ५० टक्के अनुदानाचा वाटा अद्याप एक वर्षापासून शेतकर्यांना दिला नसल्यामुळे जवळपास दीड कोटी रुपयांचे अनुदान थकले आहे. राज्यात वारंवार दुष्काळाचे संकट येत आहे. अनेक धरणे बांधकामाअभावी बंद पडली आहेत. पावसाचे प्रमाण कमी होत आहे. पाण्याचा साठा कमी होत आहे. राज्यात काही वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. शासनाने शेतकर्यांना कमी पाण्यावर जास्त सिंचन करण्यावर भर देण्याचे आवाहन केले. यासाठी शासन शेतकर्यांना ५० टक्के अनुदान देते. २०१२ ते २०१३ या आर्थिक वर्षातील ५०० शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात ठिबक सिंचनाचा वापर केला. पूर्वी तालुक्यात ३५०० हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली होते. आता ५ हजार हेक्टर्सपर्यंत क्षेत्र पोहोचले आहे. बाजारात अनेक खाजगी कंपन्यांकडून ठिबक संच व तुषार संच उपलब्ध आहेत. शेतकर्यांनी सरकारच्या अनुदान यादीतील कंपन्यांमार्फत ठिबक सिंचन करून घेतले आहे. या वाढत्या ठिबक सिंचनामुळे पाण्याचा होणारा अपव्यय कमी झाला आहे. कमी पाण्यावर जास्त शेती क्षेत्र सिंचनाखाली आलेले आहे. आणखी शेतकर्यांंचा ओढा वाढला असता पण; शासनाने या योजनेतील अनुदान कृषी विभागाकडे उपलब्ध करून दिलेले नाही. यामुळे शेतकरी या योजनेपासून दूर जाताना दिसत आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी विठ्ठल लहाने यांच्याशी संपर्क साधला असता २०१२-१३ या वर्षातील शासनाचे अनुदान उपलब्ध झालेले नाही. सदरील अनुदान उपलब्ध होताच संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाईल. पूर्वी ठिबक सिंचन केल्यानंतर संबंधित कृषी विभागाकडे कागदपत्र सादर केले की, शेतकर्यांची फाईल संबंधित विभागामध्ये फिरत असे. पण आता आॅनलाईन ही फाईल अपलोड करण्यात येत आहे. यामुळे कामात जलदता आली. पण; अनुदान वाटपाला मात्र उशीर होत आहे. ठिबकने बारमाही पिके वाढली. शेतकर्यांनी सूक्ष्म ठिबक योजना शेतात राबविल्यामुळे औराद कृषी मंडळात ऊस, भाजीपाला, फळबाग या पिकांच्या क्षेत्रामध्ये वाढ होऊन उत्पादनही वाढले आहे. परंतु, अनुदान थकल्यामुळे शेतकर्यांत नाराजी असल्याचे माधवराव थेटे यांनी सांगितले.
सिंचनातले अनुदान आटले !
By admin | Updated: May 22, 2014 00:13 IST