संजय कुलकर्णी , जालनाजिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाअंतर्गत गेल्या चार वर्षांपासून नवीन कामेच सुरू नसल्याने निधी मिळणे बंद झाले होते. आता जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या तीन कोटींच्या निधीमुळे ७५ कामे मंजूर झाली असून त्यापैकी ६४ कामांच्या निविदा देखील काढण्यात आल्या आहेत.२००९-१० मध्ये सिंचन विभागातील २३ कोटींच्या अनियमिततेमुळे विविध कामांची चौकशी सुरू झाली होती. त्यामुळे नवीन कामांसाठी शासनाकडून निधी मिळणे बंद झाले. २०१०-११ व २०११-१२ मध्ये जुनी कामे पूर्ण करण्यावरच भर द्यावा लागला. तर २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षात केवळ एक लाखांचाच निधी या विभागाला प्राप्त झाला होता. त्यामुळे या विभागाची अवस्था ‘असून नसल्यासारखी’ अशीच झाली होती. परंतु तत्कालीन अध्यक्षा आशाताई भुतेकर यांनी २०१४ मध्ये सिंचन विभागाला निधी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलेल्या उपोषणाची दखल घेत जिल्हा नियोजन मंडळाने तीन कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी आता प्राप्त झाला असून त्यामुळे सिमेंट बंधाऱ्यांच्या ६४ कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या आहेत. तर पिंपळगाव कोलते व गाढे सावरगाव येथे प्रत्येकी एक कोल्हापुरी बंधारा देखील मंजूर करण्यात आला असून कोल्हापुरी बंधारे व अन्य ९ कामे यासाठीची ई-निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. चार वर्षांपासून सिंचन विभागाला शासनाकडून निधी देणे बंद झाल्याने हा विभाग दुर्लक्षित झाला होता. या विभागात कार्यकारी अभियंता म्हणून एकही अधिकारी अधिक काळ कार्यरत राहिले नाहीत.त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंत्यांना वापरासाठी कालबाह्य झालेले शासकीय जीप हाही चर्चचा विषय ठरला होता.
‘सिंचन’ला आली उभारी
By admin | Updated: May 3, 2015 00:58 IST