भास्कर लांडे ल्ल हिंगोलीजिल्ह्यातच हळदीचे चांगले मार्केट असल्यामुळे दोन एकरात १५ पोती खत आणि २७ हजारांचे बियाणे विकत घेवून टाकले; परंतु मान्सूनच्या पूर्वसंध्येला पडलेला पाऊस उघडून बसल्याने उन्हामुळे हळद करपू लागली. म्हणून पाईपलाईनद्वारे पाणी आणून तुषारमार्फत देण्याचा प्रयत्न केला. एवढा खटाटोप करून लाख रूपये घातल्यानंतही हळद उठली नसल्यामुळे घोटादेवी येथील उत्पादकाने हळहळ व्यक्त केली. अल्पश: पावसावर पेरणीचा जुगार खेळलेल्या जिल्ह्यातील प्रत्येक उत्पादकाची ही भावना असून यंदा मान्सूनच्या पाण्याऐवजी उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी येत आहे.गतवर्षी १२ जूनला आगमन झालेल्या पावसाने सातत्य राखल्याने लवकरच पेरण्या आटोपून पिके वाढण्यास सुरूवात झाली होती. यंदा देखील तशीच परिस्थिती राहील, या आशेने जिल्ह्यातील काही उत्पादकांनी धूळपेरणी केली. अगदी मान्सूनच्या सुरूवातीला पाऊस पडल्याने धूळपेरणीचा डाव साधण्याची उत्पादकांना हमी वाटली; पण चित्र पालटले, धूळपेरणीचा जुगार उत्पादकांच्या अंगलट आला. त्याचा फटका हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथील सुरेश राजाराम शेळके यांना बसला. मृगनक्षत्रात झालेल्या पावसात शेळके यांनी दोन एकरात १५ हजारांचा १५ पोती डीएपी खत टाकला. त्याआधी २९ हजारांचे हळदीचे बियाणे टाकले. मोठ्या आशेने हळद लागवड करताच पाऊस गायब झाला. उन्हाळाच संपला नसल्याने सूर्य आग ओकू लागला. जमिनीत पाणी मुरलेच नसल्यामुळे आतील उष्णतेमुळे हळद उठण्याचा विषय नव्हता. हातातील ५० हजार पेरणीला घालून आभाळाकडे बघण्याची वेळ शेळके यांच्यावर आली. महागामोलाचे खत-बियाणे टाकून फायदा होत नसल्यामुळे पश्चातापाची वेळ त्यांच्यावर आली. कोणत्याही परिस्थितीत हळदीला वाचविण्याचा निर्धार शेळके यांनी केला. दोनशे मीटर अंतरावर असलेल्या विहिरीतील पाणी पाईलाईनद्वारे आणले; पण दोन एकरातील हळदीला पुरेल, असे पाणी विहिरीत नव्हते. काहीही करून हळद वाचविण्यासाठी शेळके यांनी आणखी पैसे घातले. ३० हजार रूपये खर्चून तुषारसंच विकत आणला; पण हळद लागवड करून १० दिवस उलटले होते. त्यातच कोरडी जमीन भरमसाठ पाणी पिऊ लागली. बारा-बारा तासाच्या वीज भारनियमनामुळे त्यात बाधा येवू लागली; पण जमीन भिजेना आणि हळद उठेना, अशा संकटात शेळके सापडले. पेरणीपासून आजपर्यंत १ लाख रूपये खर्चून आभाळाकडे पहावे लागत असल्याने त्यांनी हळहळ व्यक्त केली. शेळके यांच्या प्रमाणे जिल्ह्यातील बहुतांश उत्पादक व्यक्त करीत आहेत. मान्सूनच्या पावसावर जुगार खेळण्याचा प्रयत्न आज अंगलट आला. अनेक गावातील शेतकरी लाख-लाख रूपयांना बुडाले. पदरमोड केलेल्या उत्पादकांना आज अन्न गोड लागेना. आधीच जुळवाजुळव करून पेरणीचे बियाणे विकत घेतले होते. आता कोणाकडे हात पसरावे, असा प्रश्न उत्पादकांना पडला आहे. दिवसेंदिवस पाऊस लांबतच असल्यामुळे उत्पादक पावसाचा धावा करीत आहेत; पण दुबार पेरणी केलेल्या उत्पादकांच्या कडा पाणावल्या आहेत.
पावसाऐवजी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
By admin | Updated: June 29, 2014 00:23 IST