दावरवाडी : दावरवाडी परिसरातील खेर्डा प्रकल्पात जवळपास ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मात्र या प्रकल्पाचे पाणी साठा वाढल्याने कालवा दरवाजा व सांडवा नादुरुस्त झाल्याने वाया जात होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच संबंधित अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची पाहणी करून प्रकल्पातील पाणी गळती बंद केली.या प्रकल्पातील पाण्यावर पाचोड, बालानगर, दावरवाडी, वरूडी, नानेगाव, तांडा बु खु, खेर्डासह अनेक गावांची तहान भागविली जाते. या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी विहीरीद्वारे पाईपलाईन करण्यात येतो. मात्र सध्या तुडूंब भरलेल्या या प्रकल्पाचे दरवाजे आणि सांडव्याची नादुरूस्ती झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. याप्रकरणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती.या खेर्डा प्रकल्पातुन वाया जाणाऱ्या पाण्यामुळे आजुबाजुच्या शेतांमधील पिकांचे नुकसान होत आहे. तसेच पाणी वाया जाण्यामुळे भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे वाया जाणाऱ्या पाणी त्वरीत बंद करण्याची माणगी खेर्डाचे सरपंच गणपत माने यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. यानंतर प्रकल्पातुन पाणी वाया जात असल्याचे लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत उपविभागीय अधिकारी केशव नेटके, कार्यकारी अभियंता अनिल निंभोरे, उपकार्यकारी अभियंता देवेंद्र अप्पा, शाखा अभियंता धनंजय गर्जे, खेर्डाचे सरपंच गणपत माने, बालानगरचे सरपंच अमोल गोर्डे, मंडळ अधिकारी संजय राऊत, उपसरपंच काकासाहेब घोंगडे तलाठी बी. एम. गाढे आदींनी प्रकल्पाची पाहणी केली. यानंतर प्रकल्पातील पाणी गळती त्वरीत बंद करण्यात आली आहे. प्रकल्पातील उर्वरीत दुरूस्ती त्वरीत करण्यात येईल अशी माहिती कार्यकारी अभियंता लिंबोरे यांनी दिली.
खेर्डा प्रकल्पाची अधिकाऱ्यांकडून पाहणी
By admin | Updated: October 16, 2016 01:10 IST