कळंब : गावातील तंटे गावातच मिटवून गावामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी स्थापन केलेल्या तंटामुक्त समित्यांमागे आता शासन निर्णयानुसार बक्षिसाच्या रकमेचा विनियोग झाला नसल्याने चौकशी व कारवाईचा ससेमिरा लागला आहे. खर्च करताना नियमांचे उल्लंघन झाल्याने समिती पदाधिकार्यांवर रक्कम निश्चित करून त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित गावातील पदाधिकारी व पुढार्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गावात तंटे निर्माण होऊ नयेत, दाखल झालेले तंटे व नव्याने निर्माण झालेले तंटे आपसात मिटवून गावात शांतता प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने १५ आॅगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात आली. या योजनेत अनेक गावांनी सहभाग नोंदविला. काही गावांत चांगले फलितही मिळाले. तंटामुक्त गाव योजनेत भाग घेणार्या व २०० पैकी २०० गुण मिळालेल्या गावास पात्र ठरवून बक्षिसाची रक्कम देण्यात येते. त्यानुसार कळंब तालुक्यातील २६ गावांना ६८ लाख रूपये एवढी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली होती. मोहा, डिकसळ, ईटकूर, या गावांना प्रत्येकी ७ लाख, कन्हेरवाडीला ५ लक्ष, हसेगाव, मस्सा खंडेश्वरी या गावांना प्रत्येकी ४ लाख, आंदोरा, हावरगावला प्रत्येकी ३ लाख, सात्रा, पिंपळगावला प्रत्येकी दोन लाख तर खडकी, भोगजी, कोठाळवाडी, बहुला, आडसूळवाडी, ताथर्डी, भाटसांगवी, आथर्डी या गावांना प्रत्येकी १ लाख रूपये वितरित करण्यात आले. परंतु, बक्षिसाच्या रक्कमा मिळाल्यानंतर मात्र, या गावांतील समितींचे आर्थिक व्यवहाराचे अनेक तंटे बाहेर येऊ लागले आहेत. कारणे दाखवा नोटीस परिशिष्ट सातनुसार बक्षिसाच्या रकमेचा विनियोग न केल्याप्रकरणी पंचायत समिती गटविकास अधिकार्यांनी ६ मे रोजी २ लाख रूपयांच्या अनियमिततेसाठी मोहा, ३१ हजार ४९८ रूपयांसाठी आडसूळवाडी, ३१ हजार ५०० रूपयांसाठी भाटसांगवी, २४ हजार २४१ रूपयांसाठी गंभीरवाडी, १४ हजार ५०० रुपयांसाठी आठळा, ३३ हजार १५० रूपयांकरिता शेळका धानोरा, ३१ हजारांसाठी कोठाळवाडी येथील पदाधिकार्यांना उपरोक्त रक्कम भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. यासोबतच हासेगाव (के.), खेर्डा, आंदोरा, बहुला येथील पदाधिकार्यांना अभिलेखे सादर न केल्यामुळे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित गावच्या ग्रामसेवकांनाही नोटीस देऊन आपली एक वार्षिक वेतनवाढ का बंद करण्यात येऊ नये, अशी विचारणा नोटिसेद्वारे करण्यात आली आहे. फौजदारी गुन्हे दाखल करावेत तंटामुक्त योजनेसाठी बक्षिसाची रक्कम गृहविभागाकडून देण्यात येते. या रक्कमेचा विनियोग गृह विभागाने दिलेल्या निर्देशानुसार होणे गरजेचे होते. परंतु, गावपुढार्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे संबंधितांची चौकशी करून त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी कचरू टकले यांनी केली आहे. परिशिष्ट सात काय सांगते? ४गृहविभागाच्या शासन निर्णयात बक्षीस मिळालेल्या रक्कमेचा विनियोग कसा करायचा याबाबत परिशिष्ट ७ मध्ये स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रत्येक निर्णय ग्रामसभेने घ्यावा, निर्णय घेताना २ टक्के रक्कम पुरस्कार समारंभासाठी, १५ टक्के रक्कम प्रचार, प्रसिद्धीसाठी, ५ टक्के रक्कम प्रशासकीय बाबींसाठी १५ टक्के रक्कम शिक्षणासाठी प्रोत्साहन आदी निकषांचा समावेश आहे. परंतु, याकडे गावपुढार्यांनी साफ दुर्लक्ष केल्याचे समोर आले होते. पंचायत समिती स्तरावर झाली होती चौकशी कचरू टकले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर कळंब पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी एस. ए. भांगे, व्ही. व्ही. बावीकर, यांना २९ एप्रिल रोजी चौकशीसाठी नेमले. यावेळी सदरील पथकाने वस्तुनिष्ठ चौकशी करू गटविकास अधिकार्यांना २ जुलै २०१३ रोजी आपला अहवाल सादर केला होता. त्यानुसार मोहा, भाटसांगवी, गंभीरवाडी, खोंदला, कोठाळवाडी आदी गावांमध्ये शासन निर्देशानुसार बक्षिसाची रक्कम खर्च झाले नसल्याचे उजेडात आले. तर काही गावांनी चौकशीसाठी रेकॉर्ड उपलब्ध करून दिले नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पोलिस अधीकारी यांनी चौकशी करून कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. तक्रारीमुळे पितळ उघडे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेअंतर्गत बक्षीसपात्र ठरलेल्या गावात प्राप्त रक्कमेचा विनियोग न करता भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कचरू टकले यांनी ५ मार्च २०१३ रोजी केली होती. या तक्रारीकडे सर्वसंबंधितांकडून डोळेझाक केली जात असताना टकले यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली. त्यानंतर प्रशासनाने चौकशीचा फास आवळला.
तंटामुक्त समित्यांमागे चौकशीचा ससेमिरा
By admin | Updated: May 26, 2014 00:26 IST