\लातूर : तिसरे अपत्य प्रकरणी तालुक्यातील पिंप्री अंबा येथील ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले होते़ त्यामुळे या दोन्ही सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली़ आयुक्तांनी या दोन्ही सदस्यांना पुन्हा पात्र ठरविले आहे़ त्यामुळे या ग्रामपंचायतीवर नानासाहेब भिसे पॅनलचे वर्चस्व कायम राहिले आहे़तालुक्यातील पिंप्री अंबा येथील ग्रामपंचायत ही ९ सदस्यांची आहे़ या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नानासाहेब भिसे पॅनलचे ५ सदस्य विजयी झाल्याने त्यांच्या पॅनलचे वर्चस्व राहिले़ दरम्यान, जयचंद भिसे यांनी ग्रामपंचायत सदस्य मेघराज आदमाने आणि लक्ष्मण बंडगर या दोन सदस्यांवर आक्षेप घेतला़ या सदस्यांना तिसरे अपत्य असल्याची तक्रार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती़ त्यामुळे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन आदमाने आणि बंडगर या दोन सदस्यांना अपात्र ठरविले़ या निर्णयाच्या विरोधात या दोन्ही सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली़ विभागीय आयुक्तांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश खारीज करुन पुन्हा या दोन्ही सदस्यांना पात्र ठरविले आहे़ त्यामुळे गावात पुन्हा बुधवारी जल्लोष करण्यात आला़
अपात्र सदस्य झाले पात्र
By admin | Updated: February 20, 2015 00:08 IST