गंभीर समस्या : गाळ उपसा नसल्याने पाणीसाठा होईनाविष्णू गायकवाड ल्ल गढीकोणत्याही गावास त्या-त्याठिकाणचे पाझर तलाव व धरणातील पाण्याचा मोठा आधार असतो. त्यावरच शेती व्यवसाय तग धरुन असतो. मात्र गेवराई तालुक्यातील गढी परिसरानजीक असलेल्या गोविंदवाडी व शिंदेवाडी पाझर तलावाची दुरवस्था झाली आहे. गाळ काढला नसल्यामुळे पाणीसाठा होत नाही. त्याचा फटका सध्या दुष्काळात शेतकऱ्यांना बसत आहे.अवर्षणाचे हे चौथे वर्ष आहे. थेंब-थेंब पाण्याचे महत्त्व प्रत्येक नागरिकाला दुष्काळामुळे पटू लागले आहे. त्यामुळे गावांगावामध्ये त्यांच्या भागातील साठवणूक करणाऱ्या तलाव, धरणाच्या स्थितीबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दुष्काळापूर्वीच्या काळात तलावाची दुरुस्ती झाली असती तर आजच्या घडीला पाणीटंचाई फारशी गंभीर झाली नसती, अशी चर्चा गावांमध्ये सुरू आहे. गेवराई रस्त्यालगत असलेल्या गोविंदवाडी तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. या तलावातील गाळ उपसा व खोलीकरण केले तर त्याचा लाभ जवळपासच्या शेतीबरोबरच परिसरातील गावांना याचा लाभ होईल. तसेच जलस्त्रोत वाढण्यासही मोठी मदत होईल. या कामासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. तलाव उशाला आणि कोरड घशाला गोविंदवाडी व शिंदेवाडी तलाव परिसराला लागूनच असल्याने या तलावामध्ये पाण्याचा मोठे स्त्रोत उपलब्ध होवू शकत असतानाही याकडे प्रशासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केल्याबदल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षापूर्वीचे या तलावाची व्यवस्थित देखभाल केली असती तर तलावामुळे अर्ध्या परिसराला पाणी टंचाई जाणवली नसती. या संदर्भात गेवराईचे तहसीलदार संजय पवार म्हणाले, दोन्हीही पाझर तलावांची पाहणी करून खोलीकरण व डागडुजी करण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना दिल्या जातील. गाळ उपसा नाही : शेती नाही ओलिताखालीगोविंदवाडी तलाव हा महामार्गाशेजारी असल्यामुळे तो पिकनिक स्पॉट होऊ शकतो. तलावाच्या परिसराचे सौंदर्यीकरण केले तर हा तलाव इतरांसाठी आकर्षण ठरू शकते. शिंदेवाडी व गोविंदवाडी तलावांची अनेक वर्षांपासून डागडुजी झालेली नाही. तसेच गाळ उपसा झाला नसल्यामुळे भरपूर क्षमता असतानाही अपेक्षित पाणीसाठा होत नाही.
पाझर तलाव दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By admin | Updated: May 9, 2016 23:55 IST