रमाईला वंदन: ‘तुफानातले दिवे’ आंबेडकरी जलशाने भारावले रसिक
औरंगाबाद: सोन्याचे पानदान, हळदी कुकाने घाशीन...माझ्या भीमाचा प्रसाद, उभ्या गल्लीने वाटीन... या लोकगिताने अवघ्य सभागृह शहारले. प्रत्येकाच्या अंगावर रोमांच तरारले. कान तृप्त झाले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने सभागृह डोक्यावरच घेतले.
प्रसंग होता, माता रमाई आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘तुफानातले दिवे’ या आंबेडकरी जलशातील. तापडीया नाट्य मंदिरात रविवारी प्रबोधनाचा जागर घालण्यात आला. शाहिरी जलसा हा आंबेडकरी चळवळीचा तसा जीव की प्राण. ऑर्केस्ट्राच्या धांगडधिंग्यात दबलेला शाहिरी जलसा शहरातील अजय-चेतन या उदयोन्मुख कलावंतांनी नव्या रंगाढंगात सादर केला. त्याला लोककलेचा अस्सल बाज व प्रबोधनाची मोठी उंची दिली ती मुंबई विद्यापीठातील प्रा. गणेश चंदनशिवे या कसबी शाहिराने. हलगी, संबळ, ढोलकी व खंजिरीच्या तालासुरात त्यांनी सादर केलेले सोन्याचे पानदान या लोकगीताला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. १९३० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत सादर झालेले, ‘महाराचं पोरं बीट्या लय हुशार’ हे लोकगीतही चंदनशिवे यांनी खास तमासगिरीच्या ढंगात सादर केले, तेव्हा जलशाचा जीवंतपणा प्रेक्षकांना भावल्याचे दिसत होते.
अजय देहाडे यांनी गायीलेले ‘भीम मोत्याची माळ गं माय, भीम नंगी तलावर गं माय... , कुणाल वराळे यांनी सादर केलेले, ‘जशी सोन्याची सकाय व्हय, तशी रमाई माझी माय व्हय’... आदेश आटोटे यांचे, ‘ रमाई शिकली बाराखडी’, चेतन चोपडे यांचे, भीम युगाचे तांबडं फुटल, तेव्हा देशाचे गिऱ्हाण सुटलं’ ही गीते उत्स्फूर्त प्रतिसादात सादर झाली.
जलशाचे उद्घाटन घाटी रुग्णालयाच्या अधीष्ठाता डॉ. कानन येळीकर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर, फौजदार पल्लवी जाधव आणि लोकमत हेल्पलाईनच्या नीता इंदानी यांच्या हस्ते झाले. कोरोना काळात गोरगरिबांना मदत करणाऱ्या रमाईंच्या लेकींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
चौकट
जलशाचे आधुनिक फ्यूजन
तुणतुणे, ढोलकी, पेटी या पारंपारिक वाद्यावर जलसा सादर होते. या आधुनिक तरूणांनी जलशाचा पारंपारिक बाज राखत त्याला आधुनिकतेचा टच दिला. पारंपारिक वाद्यासह, खंजिरी, हलगी, संबळ, ढोल, कच्ची, ड्रमसेट, सिंथेसायझर, कीबोर्ड, सेक्सोफोन, गीटार, बासरी, कलॉट, अशी ताल व तंतू वाद्यासह इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांचा या जलशात केलेला संगम कर्णमधूर होता.
चौकट
सांस्कृतिक चळवळ संपली तर...
हा जलसा सादर करण्यामागील वैचारिक पाठबळ प्रा. दिलिप महालिंगे यांचे होते. सादरीकरण करणारे सर्व कलावंतही महालिंगे यांच्याच तालमीत तयार झालेले आहेत. यावेळी बोलतांना प्रा. महालिंगे म्हणाले, आंबेडकरी चळवळ सुशिक्षितांनी नव्हे तर निरक्षरांनी जोपासली व वाढविली. तिचा आधार हे लोककलावंत व त्यांचे सांस्कृतिक उपक्रम होते. परंतु आता ही सांस्कृतिक चळवळ संपते आहे. चळवळ संपली की गोरगरिबांच्या झोपड्या पेटतात. ही आग लवकर आपल्या घरावर येणार आहे.
फोटो-