औरंगाबाद : मुख्यमंत्री वर्षभरापासून घरी बसूनच काम करीत आहेत, असा आरोप वारंवार विरोधकांकडून होत होता. आज यावर चुप्पी तोडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत विरोधकांना उत्तर दिले. होय, मी घरी बसून काम करीत होतो. मीच नागरिकांना घरी रहा, सुरक्षित रहा, असा सल्ला दिला होता. घरी बसून काम केल्यामुळे आज हजारो कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन होत आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे शनिवारी विरोधकांना लगावला.
गरवारे क्रीडा संकुलावर आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री सुभाष देसाई, नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६८० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे आभासी पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. १७४ कोटींचे सफारी पार्क, १५२ कोटींच्या रस्त्यांची कामे, २५ कोटी रुपये खर्चाच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे भूमिपूजनसुद्धा रिमोट दाबून करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शहराशी अतूट नाते होते. हे नाते अधिक मजबूत करण्यासाठी मी आलोय. शिवसेनाप्रमुखांची ओळख रिमोट कंट्रोल अशी होती. आज विकासकामांचे भूमिपूजनसुद्धा रिमोट दाबून करण्यात आले. हा योगायोगच म्हणावा लागेल. समृद्धी महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्याशी संवाद साधून मोबदला दिला. चिकलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. सिडको-हडकोच्या लीज होल्डमधील मालमत्ता फ्री होल्ड करण्यासंदर्भात आजच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
श्रीखंड्या होण्यासही तयार
पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे शिष्य श्रीखंड्या यांनी कावडीमधून पाणी आणून पाण्याचा हौद भरला होता. औरंगाबादेतील लाखो नागरिकांची तहान भागविण्यासाठी मी श्रीखंड्या होण्यासही तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.