औरंगाबाद : मुख्यमंत्री व्हायची मला अजिबात घाई नाही. काँग्रेसमधील निर्णय प्रक्रिया मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. त्यामुळे मी कधीही पळापळ करीत नाही. आतापर्यंत मिळाले त्यात मी पूर्ण समाधानी आहे, असे कायम मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांनी आज येथे सांगितले. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकारांशी राजकीय विषयांवर संवाद साधला. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. याविषयी विचारले असता विधानसभा निवडणुकीला अवघे दोन महिने उरले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष बदलून फरक पडणार नाही. उलट एकदिलाने काम करण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार या थेट प्रश्नावर पतंगराव कदम म्हणाले, मी सरकारमधला सिनिअर मोस्ट नेता आहे; पण आमच्या पक्षात मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्ष बदलाचे निर्णय इथे होत नसतात. आमच्या पक्षात केवळ दोन ओळींचा ठराव होतो आणि सर्व अधिकार हायकमांडला दिले जातात. मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही. आतापर्यंत खूप काही मिळाले आहे. छोट्या गावातून आलो असूनही आमदार झालो. गेली ३० वर्षे आमदार आहे. २० वर्षांपासून मंत्री आहे. एक मोठे विद्यापीठ सुरू केले. त्यामुळे मी काँग्रेसमध्ये पूर्ण समाधानी आहे, असेही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस कितपत यशस्वी होऊ शकेल? या प्रश्नावर पतंगराव म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. हा पराभव मान्य करावाच लागेल; पण निवडणुकीत जय पराजय होत असतात. मी इंदिराजींना बघितले आहे, आणीबाणीनंतर पराभव झाल्यावर त्या कराडला आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासोबत केवळ पाच लोक होते; पण काही वर्षांतच त्यांनी भरघोस यश मिळविले. त्या पुन्हा सत्तेत आल्या. मोदी लाट आता विरली आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा जोमाने कामाला लागलो आहोत. अशोकराव राज्याचे नेतेआगामी विधानसभा निवडणुकीतील माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भूमिकेविषयी विचारले असता त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. मात्र, अशोकराव हे मराठवाड्याचेच नव्हे तर राज्याचे नेते आहेत. त्यांच्यावर कोणती जबाबदारी राहील हे आत्ताच सांगता येत नाही. काँग्रेसमध्ये सर्व त्या- त्या वेळी ठरते. त्यामुळे सध्या त्याविषयी चर्चा करणे योग्य नाही.
मुख्यमंत्री व्हायची घाई नाही, मी पूर्ण समाधानी
By admin | Updated: July 5, 2014 01:02 IST