येरमाळा/पेठसांगवी : गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले. नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाला सादर केले. त्यानुसार मदतीची रक्कमही प्राप्त झाली. मात्र अनेक शेतकऱ्यांची नावे लाभार्थ्यांच्या यादीत नाहीत. नुकसान होऊनही मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. येरमाळा परिसरातील ५० वर शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे धाव घेतली. तर पेठसांगवी येथील शेतकऱ्यांनी तलाठ्याला धारेवर धरले. शेतावर न जाता पंचनामे ?येरमाळा : परिसरात वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस झाला होता. यामध्ये फळबागांसोबतच रबीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर शासनाने पंचनामा करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाला दिले होते. मात्र पंचनामे करताना संबंधित कर्मचारी शेतावर गेले नाहीत, असा आरोप वंचित शेतकऱ्यांकडून होवू लागला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीमुळे शेकडो शेतकऱ्यांना नुकसान होवूनही अनुदान मिळालेले नाही. बागायती पिकांचा यात समावेश न केल्याने परिसरातील केळी उत्पादक अडचणीत आले आहेत, असे वैजिनाथ बारकूल, आशाबाई विधाते आणि विजय देशमुख म्हणाले. पंचनामा हा प्रत्यक्ष शेतावर न जाता कार्यालयात बसून केला, असा आरोपही संबंधित शेतकऱ्यांकडून केला जात आहे. अनेक शेतकरी जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. अशा काही शेतकऱ्यांना क्षेत्राच्या प्रमाणात अनुदान मिळाले. मात्र दुसरीकडे काही शेतकऱ्यांच्या हातावर नाममात्र रक्कम ठेवण्यात आली, असे अमोल पाटील म्हणाले. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनावर धनंजय बारकूल, नितीन कवडे, सुधाकर विधाते, अमोल पाटील, उमेश बारकूल आदींच्या सह्या आहेत.३०० लाभार्थ्यांच्या मदतीकडे डोळेपेठसांगवी : उमरगा तालुक्यातील पेठसांगवी परिसरात मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. यामध्ये शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे. आजही तब्बल ३०० शेतकरी अनुदानाच्या रक्कमेकडे डोळे लावून आहेत.नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर अनुदानाच्या रक्कमा शासनाने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केल्या आहेत. यातील काही शेतकऱ्यांना ९ हजार तर काहींना ४ हजाराप्रमाणे अनुदानाच्या रक्कमा वितरित करण्यात येत आहेत. जवळपास ८२६ शेतकऱ्यांना ३६ लाख ८४ हजार रुपये इतकी रक्कम वितरित करण्यात आली. मात्र ३०० वर शेतकऱ्यांना एक छदामही मिळालेला नाही. त्यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तलाठ्याला जाब विचारला. महसूलच्या कर्मचाऱ्यांनी तोंडे पाहून लाभार्थ्यांची निवड केली, असा आरोप होत आहे. काही शेतकऱ्यांनी तर तलाठ्याला घेरावही घातला. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करुन नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी सोसायटीचे चेअरमन गणेश पाटील यांनी केली आहे. (वार्ताहर)
गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा
By admin | Updated: June 21, 2014 00:54 IST