राजकुमार जोंधळे , लातूरशहरातील अंजली नगरातील एका शाळकरी मुलीचा राजस्थानात जन्मदात्या आईनेच दोन लाखांत सौदा करुन, बळजबरीने लग्न लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिसात तिघांविरोधात गुन्हा दाखल आहे. पीडित मुलीने थेट राजस्थानातून आपल्या पित्याच्या मोबाईलवर संपर्क साधून घडल्या प्रकाराची कैफियत मांडली आहे. ‘अबू मुझे बचाव...मुझे यहाँसे जल्दीसे छुडाओ...अशी आर्त हाक रुक्सानाने (नाव बदलले आहे) आपल्या पित्याला दिली आहे. २१ जानेवारीपासून शाळेत गेलेली रुक्साना घरी परतलीच नाही. सध्याला ती राजस्थानात असल्याचे पुढे आल्याने, पठाण कुटुंबियांना धक्काच बसला. आपल्या पोटच्या मुलीचा दोन लाखात सौदा करणारी आई मात्र फरार आहे. आपल्यावर गुदरलेल्या प्रसंगाने अस्वस्थ आणि हादरलेल्या जन्मदात्या पित्याने तर इकडे अन्नपाणीही सोडले आहे. पंधरा दिवसांपासून रुक्सानाच्या शोधात पठाण कुटुंबिय पायाला भिंगरी बांधल्यागत भटकत आहेत. रुक्साना राजस्थानात असल्याचे समजल्यानंतर तिच्या सुटकेसाठी कुटुंबियांनी पोलिसांकडे दाद मागितली आहे.लातूर शहरातील अंजली नगरात राहणाऱ्या फिरोज पठाण यांना दोन मुली, एक मुलगा आहे. मार्केट यार्डात ते रिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. मोलमजुरीवर आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्या पठाण यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याने ते पुरते हादरले आहेत. शहरातील रुकय्याबेगम उर्दु शाळेत रुक्साना इयत्ता आठवीत शिकत होती. २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता आई जरीना पठाण हिने आपल्या मुलीला शिष्यवृत्तीचे पैसे बँकेतून काढायचे आहेत, असे सांगून शाळेतून शाहू चौकात नेले. येथे मारहाण करुन रुक्सानाला आॅटोत कोंबले. पुढे लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकात आणले. येथे शांताबाई आणि राकेश हे दोघे वाट पाहत बसले होते. पीडित मुलगी व तिची आई येताच चौघेही बसमध्ये बसून, राजस्थानात गेले. या घटनेत शांताबाई आणि राकेश या दोघांचाही सहभाग असल्याचे रुक्सानाने आपल्या पित्याला मोबाईलवरुन सांगितले आहे. शेवटी रुक्सानाचा राजस्थानातून अचानक मोबाईलवर फोन आला. पित्याला धक्काच बसला...माँतू कहाँहैं...असे पित्याने आपल्या मुलीला विचारले. रुक्साना तिकडून हुंदके देत म्हणली, आम्मीने मुझे राजस्थान में दो लाख में बेचा हैं...मेरी जबरदस्तीसे शादीभी लगाई हैं...अबू मुझे यहाँ से जल्दी छुडाओ, अबू मुझे बचाव...अशी आर्त हाक दिली आहे. राजस्थानातील झुनझुन येथे रुक्सानाचा दोन लाखात बळजबरीने विवाह लावून देण्यात आला आहे.२ फेब्रुवारी रोजी पठाण यांच्या पत्नी जरीना या एकट्याच घरी आल्या. त्यांनी मुलीला सोबत आणले नव्हते. पठाण यांनी मुलगी कुठे आहे, अशी विचारणा केली. आम्ही दोघी एका ठिकाणी काम करत आहोत. मला १ हजार रुपये द्या, मी तिला घेवून येते, असे सांगून पठाण यांच्याकडून एक हजार घेवून ती गेली. तेव्हापासून ती गायब आहे.
आईच कशी झाली कसाई; रुक्सानाची बचावासाठी आर्त हाक..!
By admin | Updated: February 9, 2016 00:26 IST