डी़ ए क़ांबळे , हाळी हंडरगुळी चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीने उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे़ विशेषत: नदीकाठच्या २०० हेक्टर्स क्षेत्रावरील पिके आडवी झाली आहे़ शिवाय, २० पेक्षा अधिक विहिरी गाळाने बुजल्या आहेत़ शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारीही पाण्याखाली गेल्या़ मात्र अद्याप प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले नाहीत़ उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी परिसराला शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने झोडपले होते़ या पावसामुळे गावाशेजारुन वाहणाऱ्या तिरु नदीला मागच्या १४ वर्षांत कधी नव्हे तो इतका पूर आला़ नदीचे पाणी गावातील घरांघरांमध्ये शिरुन संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले़ काही घरांची पडझडही झाली़ गावातील नुकसानी प्रमाणेच नदीकाठच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले़ शेतात पाणी शिरल्याने पिके आडवी झाली़ हाळी हंडरगुळीसह परिसरातील शेळगाव, वडगाव, सुकणी, चिमाचीवाडी, मोर्तळवाडी, आनंदवाडी व इतरही काही शिवारातील पिकांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे़ साधारणत: २०० हेक्टर्सवरील सोयाबीन, ज्वारी, तूर, केळीचे नुकसान झाले़ अनेक शेतकऱ्यांचा ऊस आडवा झाला आहे़ केवळ पिकाचेच नव्हे तर विहिरींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ नदीकाठच्या जवळपास २० पेक्षा अधिक विहिरी गाळात बुडून गेल्या आहेत़ तिरु नदी व प्रकल्पावर शेतकऱ्यांनी जोडलेल्या जवळपास १ हजाराहून अधिक विद्युत मोटारीही पाण्याखाली गायब झाल्या आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे़ ज्याप्रमाणे गावातील पडझड, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात आले त्याप्रमाणे शेतीच्या नुकसानीचेही पंचनामे तातडीने करावेत, अशी मागणी शेतकरी सुनील कुंटे, खाजा तांबोळी, विकास जाधव, सतीश काळे, भाऊराव मुत्तलवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे़ अतिवृष्टीने हाळी हंडरगुळी परिसरातील व तिरु नदीशेजारील शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याबाबत उपविभागीय अधिकारी विकास खरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्राथमिक अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठविला असल्याचे सांगितले़ कृषी विभागाकडून शेतीच्या नुकसानीबाबतची प्राथमिक माहिती या अहवालात आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच नुकसानीचे पंचनामे होतील, अशी माहितीही खरात यांनी दिली़
२०० हेक्टर्सवरील पिके आडवी
By admin | Updated: September 4, 2014 01:25 IST