औरंगाबाद : आतापर्यंत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चांगलीच हजेरी लावली. शुक्रवारी सकाळपर्यंत सिल्लोड तालुक्यातील तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. कन्नड, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री तालुक्यातील इतरही अनेक मंडळांमध्ये दमदार पाऊस झाला. या पावसामुळे आता खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात जेमतेम पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक भागांत अद्याप पेरण्यांना सुरुवातही झालेली नाही. त्यातच शुक्रवारी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. शुक्रवारपासून शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत चोवीस तासांत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी अधिक पाऊस झाला.सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक सरासरी ३७.३९ मि. मी. पावसाची नोंद झाली. या तालुक्यातील सिल्लोड (८२), अजिंठा (६६) आणि निल्लोड (९०) या तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी मंडळात ५४ मि. मी., करंजखेडा मंडळात ४१ मि. मी. आणि नाचनवेल मंडळात ३० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस झाला. खुलताबाद तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सर्वाधिक ४७ मि. मी. पावसाची नोंद बाजारसावंगी मंडळात झाली. पैठण तालुक्यात बहुतेक भागांत पाऊस पडला नसला तरी बिडकीन मंडळात मात्र, ५७ मि. मी. पावसाची नोंद झाली. यासोबतच सोयगाव मंडळात २५ मि.मी., पिशोर मंडळात २६ मि. मी., वडोदबाजार मंडळात २२ मि. मी. असा समाधानकारक पाऊस झाला. जिल्ह्याचा एकत्रित विचार करता जिल्ह्यात सरासरी १५.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे आता जिल्ह्यात पेरण्यांना वेग येणार आहे. अनेक भागांत पेरणीयोग्य ओल आल्यामुळे शेतकरी कापूस लागवड करीत आहे.
तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी
By admin | Updated: June 26, 2016 00:46 IST