जालना : जिल्ह्यातील पाचही आमदारांनी गेल्या साडेतीन महिन्यांच्या काळात रस्ते आणि सामाजिक सभागृहांच्या कामांना प्राधान्य देत आपल्या निधीतील आतापर्यंत खर्चित केलेल्या रक्कमेचा वापर प्रामुख्याने त्यासाठी केला आहे. २०१२-१३ मध्ये जिल्ह्याने दुष्काळाची भयावह परिस्थिती अनुभवली. जालना शहरात अनेक भागांमध्ये जलवाहिनी अंथरलेली नसल्याने आ. कैलास गोरंट्याल यांनी गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या आमदार निधीतून प्रामुख्याने जलवाहिनी अंथरणे, अंतर्गत जलवाहिनी टाकणे त्याचबरोबर रस्त्यांच्या कामांवरही भर दिला. ७३ लाख ७० हजारांच्या खर्चातील जवळपास कामे पूर्ण झाली आहेत. भोकरदनचे आ. चंद्रकांत दानवे यांनी ४५.९२ लाखांच्या खर्चात सामाजिक सभागृहे आणि रस्त्यांच्या कामांवर भर दिला आहे. त्याचबरोबर नवीन पथदिवे, विविध समाजातील स्मशानभुमीच्या संरक्षण भिंतीची कामे यासाठी निधी दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी सामाजिक सभागृहे, स्मशानभुमी शेड, गावअंतर्गत सिमेंट रस्ते या कामांवर भर दिला. पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांसाठीही त्यांनी निधी दिला. परतूरचे आ. सुरेश जेथलिया यांनी ६ लाख ७६ हजारांच्या खर्चामध्ये सांस्कृतिक सभागृह, आणि गावअंतर्गत सिमेंट रस्त्यांच्या कामांना प्रामुख्याने निधी दिला. बदनापूरचे आ. संतोष सांबरे यांनी ४७ लाखांच्या खर्चामध्ये सिमेंट रस्ते, सामाजिक सभागृह या कामांसाठी निधी दिला आहे. पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळातील हे शेवटचे वर्ष असल्याने विविध अपूर्ण राहिलेल्या कामांवरही भर देण्याचा प्रयत्न आमदारांनी केला आहे. निवडणुकीला सामोरे जाताना आमदार निधीच्या खर्चातून आवश्यक कामांची निवड करण्यातही काही आमदारांचा वेळ जात आहे. मात्र १५ आॅगस्टनंतर आचारसंहिता लागणार असल्याने प्रमुख कामांचे प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन व विकास कार्यालयाकडे पाठविण्याचा आमदारांचा प्रयत्न आहे. मतदारसंघात यापूर्वी काही कामांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसते. अशा कामांनाही निधी देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी आपल्या स्वीय सहाय्यकांमार्फत कामांची यादी करून त्यासंबंधीचे प्रस्ताव संबंधितांमार्फत तातडीने देण्याकडे आमदारांचा कल आहे. (प्रतिनिधी)अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचाही प्रयत्ननिवडणूका जवळ आल्याने अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्नही आमदारांकडून होत आहे. त्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या जात आहेत. त्याचप्रमाणे ज्या कामांसाठी आश्वासने दिली होती, ती कामे पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात आहे.आचारसंहिता १५ आॅगस्टनंतर केव्हाही लागू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे आमदार निधीअंतर्गत आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे झटपट करण्याच्या प्रयत्नात काहीजण आहेत. त्यासाठी काही कामांचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत.
रस्ते, समाजमंदिरांच्या कामांवर सर्वाधिक खर्च
By admin | Updated: July 25, 2014 00:30 IST