औरंगाबाद : मान्सूनच्या वाटचालीमधील अडथळा आता दूर झाला आहे. त्यामुळे येत्या शनिवारी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे. त्याचवेळी तो मराठवाडा विभागातही दाखल होणार आहे. परिणामी मराठवाड्यात शनिवारपासून पुढे सलग चार दिवस दमदार पाऊस बरसणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनीता देवी यांनी लोकमतशी बोलताना दिली.दुष्काळामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात यंदा पावसाची आतुरतेने वाट बघितली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावलेल्या आहेत; पण तरीदेखील पंधरा दिवसांपासून मान्सूनची सुरुवातीची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. काही दिवसांपासून मान्सून केरळ किनारपट्टीवरच रेंगाळला होता; परंतु आता परिस्थितीत बदल झाला आहे. महाराष्ट्राच्या दिशेने मान्सूनची वाटचाल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. नैर्ऋत्य मोसमी पाऊस मध्य व उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागांत आणि ईशान्येकडील राज्ये व पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत पुढे सरकत आहे. अरबी समुद्र्रातून पुढे येणारा मान्सून कर्नाटक ओलांडून कारवारपर्यंत आला आहे. सध्या तो गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झालेला आहे. आता तो शनिवार दि. १८ जून रोजी महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पुणे येथील वेधशाळेच्या संचालिका डॉ. सुनीता देवी यांनी दिली. मराठवाड्यातील मान्सूनच्या आगमनाविषयी त्या म्हणाल्या, मान्सूनचे आगमन साधारण शनिवारीच मराठवाड्यातही होईल. त्यानंतर सलग चार दिवस विभागात पाऊस होण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी घाई नकोदुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी तूर्तास पेरणीची घाई करूनये असा सल्ला उपविभागीय कृषी अधिकारी उदय देवळाणकर यांनी दिला आहे. देवळाणकर म्हणाले की, आपल्याकडील पिकांच्या बियाणांचा खर्च मोठा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा खर्च परवडणारा नाही. साधारणत: कापूस या पिकाची लागवड ही ६० ते ७० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय करूनये. त्याप्रमाणे सोयाबीनच्या पेरणीसाठीही ९० मि.मी. पाऊस झालेला असणे गरजेचा आहे.
शनिवारपासून दमदार पाऊस
By admin | Updated: June 14, 2016 23:52 IST