जालना : शहरासह जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. शहरात सायंकाळी झालेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचून नागरिकांची मोठी त्रेधातिरपट उडाली होती. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात एकूण १५.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ७५.८७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी झालेला तालुकानिहाय पाऊस (कंसात एकूण पावसाची आकडेवारी) : जालना - १.६३ (६७.३९), भोकरदन ४६.०० (८२.७७), जाफराबाद १४.४० (६३.०८), बदनापूर ५.८० (७५.०८), परतूर २८ (९९.०४), अंबड १.०० (५६.७), घनसावंगी १८.१४ (५५.९९), मंठा ८.५० (१०५.१). जिल्ह्यात शनिवारी भोकरदन तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आल्याने काही घरांमध्ये पाणी शिरले होते. आतापर्यंत मंठा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद असून या परिसरातील नदी, नाल्यांनाही पूर आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषत: जलयुक्त अभियानाअंतर्गत ज्या नाल्यांमध्ये पाणी आले किंवा ज्या तलावांमध्ये जलसाठा निर्माण झाला, तेथील शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. जालना शहरात दुपारी ४ नंतर पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे बाजारपेठेतील खरेदीवरही परिणाम दिसून आला. सायंकाळी विविध रस्त्यांवरील सखल भागात पाणी साचले होते. शहरातील कुंडलिका नदीला चांगले पाणी आले असून शहर व परिसरातील बंधारे ओव्हरफ्लो झाले आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयामध्ये गेल्या चार दिवसातील पावसामुळे पाणीपातळीत अडीच फुटांनी वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)४ भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव शेर मुलकी येथील रहिवासी किशन बंडू साळवे यांचा पिंपळगाव नदीच्या पुराचे पाण्यात पडून मृत्यू झाला. ही घटना १२ जून रोजी घडली. याप्रकरणी हसनाबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलिस नाईक बाबासाहेब तुपे हे करीत आहेत.
जालन्यात जोरदार पाऊस
By admin | Updated: June 13, 2015 23:50 IST