हिंगोली : संरक्षक भिंत नसलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या जिल्ह्यात अडीचशेच्या घरात आहे. परिणामी, ग्रामीण भागात शाळांच्या मैदानांवर होणारे अतिक्रमण, जनावरांचा मुक्तसंचार, मद्यपींचा वावर, घाणीचा विळखा पडल्याने परिसर स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. दिवसेंदिवस शाळांची दुरवस्था होत असतानाच क्रीडाबाह्य कारणांसाठी शाळांच्या मैदानाचा वापर होत असल्याचे ‘लोकमत’ने जिल्हाभरात केलेल्या पाहणीत उघडकीस आले. जिल्ह्यात जि.प.च्या ८६८ पैकी ६१५ शाळांना कंपाऊंड वॉल उभारण्यात आल्या आहेत. उर्वरित २५३ शाळांकडे दुर्लक्ष झाल्याने मैदानाचा गैरवापर होत असल्याची स्थिती कायम आहे. त्याची सत्यता ८ आॅगस्ट रोजी ‘लोकमत’ने जिल्हाभरातील केलेल्या पाहणीत आढळून आली. प्रामुख्याने या शाळांच्या मैदानावर खेळापेक्षा भलतेच प्रकार घडतात. साधे तारांचे कुंपनही नसल्याने अतिक्रमणाचा विळखा शाळांना पडला. बहुतांश शाळांत कचराकुंड्या नसल्याने मैदानाला उकीरड्याचे स्वरूप आले. शाळा बंद होताच इतर लोकांचा वावर वाढल्याने शाळांच्या खिडक्या तोडल्या, काचा फुटल्या तर येणाऱ्या लोकांपैकी काहींनी वस्तूही घरी नेल्याचे पहावयास मिळाले.
कुणीही या अन् ठाण मांडा
By admin | Updated: August 9, 2014 00:27 IST