परतूर : तूर पिकावरील हिरवी बोंडअळी सध्या हरबरा पिकावर सुद्धा आढळून येत आहे. एकएका पानावर पाच ते सहा अळ्या पडल्याने हरभरा पिकाचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर वेळीच उपाययोजना करावी, असे आवाहन परतूर उपविभागाचे कीड नियंत्रक प्रदीप अजमेरा, देवराव ढोले यांनी केले आहे.परतूर उपविभागांतर्गत परतूर, मंठा, अंबड व घनसावंगी या चार तालुक्यात क्रॉपसॅप योजने अंतर्गत पिकाचे सर्वेक्षण करण्यात येत असून, त्यात या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला. हरभरा पिकाची रोपे पांढरट दिसून येत असल्यास त्यावर हेलिकोव्हर्पा अळीचा प्रादुर्भा नक्की झाला असे दिसून येते. पानातील हरितद्रव्य खाऊन टाकल्याने त्याचा हिरवा रंग नाहिसा होतो. ही अळी १६१ पेक्षाही जास्त पिकावर तिची उपजिविका करत असल्याने तिची जीवनसाखळी सतत चालूच राहते. अळी सध्या लहान अवस्थेत असल्याने तिचे नियंत्रण करणे अतिशय सोपे आहे. वनस्पतीजन्य किटकनाशकामध्ये निमअर्काची फवारणी तसेच दशपर्णी अर्काची फवारणी अतिशय प्रभावी आहे. त्याचप्रमाणे पक्षी थांबे तसेच कामगंध सापळ्याचा उपयोगही शेतकऱ्यांनी करावा. पांढऱ्या राखेची धुरळणीही अळीपासून पिकाचे संरक्षण करू शकते. जैविक कीड नाशकामध्ये एचएनपीव्ही १० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना त्या द्रवणात ५ ते १० मिली निळ मिसळावी. या किड नाशकाने मेलेली अळी झाडाला उलटी लटकते व ती खाली पडते. अशा अळ्या हाताने वेचून त्या रगडून त्यापासून परत एचएनपीव्ही किडनाशक बनविता येते. बॅसीलस बिव्हेरीया हे बुरशी नाशकही अळीच्या नियंत्रणासाठी उपयोगी असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)पक्षी थांबे असल्यास अळीचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो. टीव्हीच्या अॅन्टीन्याप्रमाणे लाकडी अंटीना तयार करून पिकाच्या साधारणत एक ते दोन फुट उंच बांधून तो पिकांमध्ये उभा करावा. एका एकरात २० ते २५ थांबे उभारावेत. यामुळे सकाळ, संध्याकाळ पक्षी या अॅन्टीन्यावर बसतात व पिकावरील अळ्या वेचून खातात. हा अॅन्टीना शेतात उपलब्ध असलेल्या संसाधनापासूनच बनविता येत असल्याने यासाठी खर्चही करावा लागत नाही.रासायनिक कीड नाशकाचा कमीत कमी व गरजेनुरूप कृषी विभागाच्या शिफारशीनुसार वापर करावा. दोन कीड नाशकांचे मिश्रण करू नये. तसेच एकच किड नाशकाचा वापर वारंवार करू नये, असे तंत्र अधिकारी संतोष कोयले यांनी सांगितले.
हरबरा, तुरीवर अळीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: November 19, 2015 00:20 IST