बीड: पाणीपुरवठा कामामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला असून, या कामाची चौकशी करुन दोषींविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी परळी तालुक्यातील ममदापूर येथील माजी सरपंच सुदामती हरिभाऊ धुमाळ या आपल्या कुटुंबासमवेत तर माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील शेतकरी कोंडीराम मुंडे आपली ८ एकर जमीन वहिती करताना काही लोक अडथळे आणत असून, आपल्या जिवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. यासाठी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, यासाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. परळी तालुक्यातील ममदापूर येथील माजी सरपंच सुदामती हरिभाऊ धुमाळ या सरपंच असताना उपसरपंचच ग्रामपंचायतचा कारभार हाकायचे. सुदामती धुमाळ व त्यांचे पती हरिभाऊ धुमाळ हे दोघेही निरक्षर असल्याचा फायदा घेऊन उपसरपंचाने गावातील अनेक कामात भ्रष्टाचार केला. ग्रामपंचायत ममदापूर अंतर्गत पाणीपुरवठा समित्या स्वत:च्या मर्ज़ीने तयार करुन उपसरपंच वैजनाथ दत्तात्रय कदम, ग्रामसेवक यांनी शासनाच्या विविध कामात गैरव्यवहार केला आहे. आता गावाला प्यायला पाणी नाही. त्यामुळे पाणीपुरवठा समितीने केलेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करुन दोषींविरुद्ध योग्य ती कार्यवाही, करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. माजलगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील रहिवासी असलेले कोंडीबा आश्रुबा मुंडे व उषा मुंडे यांची जमीन वडवणी तालुक्यातील चिंचवडगावमधील कुटेवाडी शिवारात गट नं. ६६ मध्ये ८ एकर जमीन आहे. मुंडे यांनी धारुर तालुक्यातील जहागीरमोहा येथील जमीन विकून भोगलवाडी येथे जमीन घेतली. ही जमीन वहिती करीत असताना नामदेव घुगे, चांगदेव घुगे, भागित्रा घुगे, रामकंवर घुगे, गोविंद घुगे, सावित्री घुगे, उर्मिला घुगे (रा. चिंचवडगाव) या लोकांनी मिळून आपल्याला काठ्याने, दगडाने मारहाण केली व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याबाबत वडवणी पोलिसांशी वेळोवेळी लेखी व तोंडी सांगूनही दखल घेतली नाही. या जमिनीत येण्यास या लोकांना पायबंद घालण्यात यावा यासारख्या मागण्यांसाठी उपोषण करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे
By admin | Updated: May 20, 2014 01:09 IST