औरंगाबाद : चिकलठाणा गायरानामधील आठवडी बाजारालगत असलेल्या नाल्यात २५ ते ३० वर्षाच्या अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत गुरुवारी सकाळी आढळला. या महिलेचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह चिकलठाणा गायरानमधील नाल्यात आणून जाळून टाकला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याविषयी पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी सांगितले की, चिकलठाणा येथील आठवडी बाजाराशेजारील नाल्यात एक अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत पडलेला असल्याचे गुरुवारी सकाळी नागरिकांना दिसले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा केला. मृताची ओळख पटू नये, यासाठी तिचा मृतदेह जाळून टाकण्यात आलेला असावा. पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत पाठविला. गुरुवारी शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतदेहांची संख्या जास्त असल्याने हे शवविच्छेदन होऊ शकले नाही. शवविच्छेदनानंतरच अनेक बाबींचा उलगडा होणार आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी घटनास्थळी पाहणी केली. डाव्या हातावर ‘अनिल’ गोंदलेले...मृत महिला ही २५ ते ३० वयाची आहे. अंगावर पांढरा पायजामा आहे, हिरव्या रंगाचा टॉप परिधान केलेला आहे. पायात जोडवे आहेत. तिच्या डाव्या हातावर अनिल असे नाव गोंदलेले आहे. तिचा खून केल्यानंतर मृतदेह निर्जन ठिकाणी रात्री आणून टाकला असावा, असा पोलिसांना संशय आहे. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे तिचा खून कोणी आणि का केला याबाबतचा उलगडा रात्री उशिरापर्यंत होऊ शकला नाही.
चिकलठाणा गायरानात आढळले महिलेचे अर्धवट जळालेले प्रेत
By admin | Updated: June 17, 2016 00:38 IST