सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गारपीट अनुदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने तहसीलदारांनी पाच गावांमधील अनुदान वाटपाची प्रक्रियाच थांबविली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे वाटप होत आहे. याकरिता सेगनाव येथील तहसील कार्यालयाला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तालुक्यात बँक पातळीवर अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गारपीट सर्वेक्षणाचे पितळ उघडे पडत आहे. येथील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध गावातील शेतकऱ्यांनी तक्रार करून अनुदान वाटपातील गोंधळ समोर आणला आहे. बहुतांश गावातील अनुदान वाटप यादीत एका शेतकऱ्याला दोन वेळेस अनुदान देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी गांभीर्याने नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचा आरोपही सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून होत आहे. या गोंधळाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतल्यानंतर तहसीलदार आर. के. मेंडके यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी असलेल्या चोंढी बु., चोंढी खुर्द, ब्राम्हणवाडा, मन्नास पिंपरी, वलाना या पाच गावाचे अनुदान वाटप थांबविले आहे. चौकशी होईपर्यंत सदर अनुदान वाटप होणार नाही. चौकशीसाठी नायब तहसीलदारासह, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. अनुदान वाटप यादीतील चुका दुरूस्त करून संबंधित गावात चावडीवाचनानंतर अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या प्रकरणात तहसील कार्यालयाने कामचुकारपणा करणाऱ्या कोणत्याच तलाठी, कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. (वार्ताहर)पाच गावांमध्ये नाराजीसेनगाव तालुक्यातील गारपीट अनुदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने तहसीलदारांनी पाच गावांमधील अनुदान वाटपाची प्रक्रियाच थांबविली आहे.तहसील कार्यालयाला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले.हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांमध्ये गारपिटीचे अनुदान वाटप जिल्हा बँकांमार्फत सुरू करण्यात आले आहे.सेनगाव तालुक्यात बँक पातळीवर अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गारपीट सर्वेक्षणाचे पितळ उघडे पडत आहे. तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध गावांतील शेतकऱ्यांनी तक्रार करून अनुदान वाटपातील गोंधळ समोर आणला. बहुतांश गावांतील अनुदान वाटप यादीत एका शेतकऱ्याला दोन वेळेस अनुदान देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.तहसीलच्या गोंंधळाचा पाच गावांतील शेतकऱ्यांना त्रास झाला आहे.
गारपीट अनुदान वाटप रोखले
By admin | Updated: June 9, 2014 01:14 IST