नांदेड : यंदा जिल्ह्यात फक्त १७ टक्के पाऊस झाला आहे़ त्यामुळे टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे़ येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास पिण्यासाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेणार असल्याची माहिती पालकमंत्री डी़पी़सावंत यांनी दिली़विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ११ दलघमी एवढा पाणीसाठा आहे़ हे पाणी आगामी तीन महिने पुरेल़ आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यास मात्र पाणीटंचाईची समस्या गंभीर होणार आहे़ विष्णूपुरीतून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी देण्यात येते़ परंतु आगामी काळात पिण्यासाठी पाणी आणावे लागणार आहे़ उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील २० दलघमी पाणी नांदेडसाठी राखीव करण्यात आले आहे़ हे पाणी कालव्याद्वारे आसना नदीत आणून त्या ठिकाणी लिफ्ट करुन काबरानगर जलकुंभात आणता येईल़ परंतु सोडलेल्या २० दलघमी पाण्याऐवजी नांदेडपर्यंत फक्त १० ते १२ दलघमी एवढेच पाणी पोहचण्याची शक्यता आहे़ दुष्काळ घोषित करण्याच्या संदर्भाने सावंत म्हणाले, सध्या जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या झाल्या आहेत़ परंतु आणेवारी कमी आहे़ आणेवारीनंतरच दुष्काळ जाहीर करता येतो़ परंतु तोपर्यंत तहसिलदारांना टँकर सुरु करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत़ तसेच शेतसारा, शेतकऱ्यांच्या पाल्यांना शुल्क माफी आदींचा निर्णयही घेण्यात आला आहे़ येत्या काही दिवसात मराठवाड्यात चारा टंचाईचा प्रश्न गंभीर होणार आहे़ त्यामुळे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चारा छावण्या सुरु करण्याचा मुद्दा जोरकसपणे मांडण्यात येईल असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
तर उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी घेणार-पालकमंत्री
By admin | Updated: August 20, 2014 00:19 IST